वृत्तसंस्था/ जकार्ता
आशिया चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी भारताने आपला दुय्यम संघ उतरविला आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाक बरोबर सोमवारी होत आहे. या सामन्यासाठी भारतीय युवा हॉकी संघाला दडपण हाताळण्याची गरज आहे.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पाक हॉकी संघामध्ये काही नवोदिताना संधी देण्यात आली आहे. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व अनुभवी वीरेंद्र लाक्राकडे सोपविण्यात आले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेनंतर लाक्राने हॉकी क्षेत्रातून निवृत्ती पत्करली होती पण त्याने निवृत्तीचा निर्णय तुर्ताला मागे घेतल्याने त्याचे या स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघामध्ये लाक्राचा समावेश होता. आगामी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची पुढीलवर्षै होणाऱया विश्वचषक हॉकी स्पर्धा लक्षात घेवून हॉकी इंडियाने आतापासूनच भारतीय हॉकी संघ भक्कम करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी यजमान भारताने यापूर्वीच आपली पात्रता सिद्ध केली आहे. सदर स्पर्धा भारतामध्ये खेळविली जाणार आहे. भुवनेश्वरमध्ये 2023 साली होणाऱया विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पाकचा संघ प्रवेश मिळविण्याकरिता झगडत आहे. आशियातील पहिले तीन संघ येत्या जानेवारीत होणाऱया विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील.
आशिया चषक हॉकी स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेतल्यास तर भारत आणि पाक यांनी स्पर्धा प्रत्येकी तीनवेळा जिंकली आहे. ढाक्का येथे 2017 साली झालेल्या या स्पर्धेचे अजिंक्यपद भारताने पटकाविताना अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव केला होता. सोमवारपासून सुरू होणाऱया आशिया चषक हॉकी स्पध्xसाठी निवडण्यात आलेल्या 20 जणांचा बारतीय हॉकी संघाला माजी कर्णधार सरदार सिंग यांचे मार्गदर्शन मिळत आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे या स्पर्धेत अनुभवी रूपिंदर पाल सिंगला सहभागी होता आलेले नाही. भारतीय हॉकी संघामध्ये अनुभवी एस.व्ही सुनील याच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. भारताच्या दहा हॉकीपटूंनी या स्पर्धेत वरिष्ठ संघात आपले पदार्पण केले आहे. यशदीप सिवाच, अभिषेक लाक्रा, मनजीत, विष्णुकांत सिंग आणि उत्तम सिंग यांनी यापूर्वी कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या कनिष्ठ हॉकसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. एस. मारेश्वरन, शेष गौडा, पवन राजबर, अभिरान सुदेव आणि एस. कांती हे या संघातील नवोदित हॉकीपटू आहेत. सिमरनजीत सिंगचे दुखापतीनंतर संघात पुनरागमन झाले आहे.
भारत आणि पाक यांच्यातील हॉकीची लढत नेहमीच चुरशीची होत असल्याने सोमवारच्या सामन्यात पुन्हा हॉकी शौकिनांना याची संधी लाभणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडूंवर नेहमीच दबाव असतो त्यामुळे भारतीय संघातील नवोदित खेळाडूंना दबाव हाताळण्याची गरज आहे. आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा जपान बरोबरचा सामना मंगळवारी होणार आहे. भारताचा अ गटात समावेश असून त्यांचा दुसरा सामना 26 मे रोजी यजमान इंडोनेशिया बरोबर होणार आहे. ब गटामध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या सोमवारी पहिल्यादिवशी मलेशिया-ओमान तसेच दक्षिण कोरिया आणि बांगलादेश, जपान आणि इंडोनेशिया यांच्यात सामने होतील.