पुणे / प्रतिनिधी :
दोन दिवसांच्या उघडीपीनंतर राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सोमवारी पावसाने झोडपले असून, मंगळवारी ही तीव्रता कायम राहणार आहे, तर दुसरीकडे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 20 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.
गेले पंधरा दिवस राज्याला पावसाने धुऊन काढले आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने उसंत घेतली, असे वाटत होते. काही काळ सूर्यनारायणाचे दर्शनही झाले. मात्र, आता पुन्हा वातावरण बदलले असून, पावसाची तीव्रता सोमवारी वाढली. उत्तर ओरिसाच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकले आहे. हे क्षेत्र सध्या दक्षिण मध्य प्रदेश तसेच विदर्भावर आहे. याच्या प्रभावामुळे रात्रीपासूनच आकाश काळे होण्यास सुरुवात झाली, तर दिवसभर जोरदार पाऊस, ढगाळ वातावरण होते. विदर्भातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. गडचिरोली, नागपूर, हिंगोली याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यातील अनेक भागात वादळी पाऊस झाला. पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहणार असून, विदर्भात मंगळवारी ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. किनारपट्टीवरही वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे. अकोला व अमरावतीला मंगळवारी आँरेज अलर्ट देण्यात आला आहे, तर राज्यात इतरत्र यलो अलर्ट आहे.
अरबी समुदातील क्षेत्राची तीव्रता कमी
अरबी समुदात गुजरात किनारपट्टीजवळ असलेल्या न्यून दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर ओमानकडे जाणार आहे.
हेही वाचा : शिंदे गटाकडून शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर