राजवाडय़ासंबंधी कागदपत्रे आजही उपलब्ध
जयपूर / वृत्तसंस्था
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालवरील वेगवेगळय़ा दाव्यांदरम्यान जयपूर राजघराण्याने ताजमहाल ही आपली संपत्ती असल्याचा दावा केला आहे. ताजमहालच्या जागेवर आमचा राजवाडा होता, असे राजघराण्याच्या सदस्या आणि आणि भाजप खासदार दिया कुमारी यांनी म्हटले आहे. तसेच ताजमहालचे दरवाजे उघडण्याची मागणी योग्य असल्याचे सांगत त्यानिमित्ताने सत्य बाहेर येईल. आम्हीही आता या प्रकरणाची चौकशी करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अयोध्या मंदिराच्या वादादरम्यान रामाच्या वंशजांचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हाही जयपूर राजघराण्याने आपण रामाचे वंशज असल्याचा दावा केला होता. या दाव्यासाठी त्यांनी न्यायालयात साक्ष देण्याची तयारी दर्शवली होती.
आमच्याकडे आजही ताजमहालशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत. या दस्तावेजांवरून पूर्वी ताजमहाल हा जयपूरच्या जुन्या राजघराण्याचा राजवाडा होता, तो शाहजहानने ताब्यात घेतला होता, असे दिया कुमारी यांनी स्पष्ट केले. तसेच जेव्हा शाहजहानने जयपूर घराण्याचा तो राजवाडा आणि जमीन घेतली तेव्हा त्यांचे राज्य असल्यामुळे राजघराणे त्याला विरोध करू शकले नाही, असेही त्या म्हणाल्या. तसेच जयपूरच्या राजघराण्याच्यावतीनेही न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे का? या प्रश्नावर आम्ही आता त्याबाबत विचार करत आहोत. यासंबंधी कोणती पावले उचलली पाहिजेत ते आम्ही तपासू, असेही त्यांनी सांगितले.
…त्यावेळी अपील करणे होते अशक्य
आजही सरकारने कोणतीही जमीन संपादित केली तर त्याच्या बदल्यात ते नुकसान भरपाई देते. त्याच्या बदल्यात आम्हाला नुकसान भरपाई देण्यात आल्याचे मी ऐकले आहे. पण त्यावेळी त्याच्याविरुद्ध अपील करण्याचा किंवा त्याच्याविरुद्ध काहीही करण्याचा कायदा नव्हता, असेही दिया कुमारी म्हणाल्या. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2017 मध्येही असेच विधान केले होते. ‘शाहजहानने जयपूरच्या राजे-महाराजांना जबरदस्तीने ताजमहाल बांधलेली जमीन विकायला सांगितल्याचे पुरावे आहेत. शाहजहानने त्यांना 40 गावे मोबदला म्हणून दिली होती, जी ताजमहालच्या जमिनीच्या किंमतीच्या तुलनेत काहीच नव्हती, असे स्वामी म्हणाले होते.
बंदावस्थेतील खोल्या उघडण्याची गरज!
‘ताजमहाल पाडावा, असे मी म्हणणार नाही, तर त्याच्या खोल्या उघडल्या पाहिजेत. ताजमहालमधील काही खोल्या बंद आहेत. काही भाग तेथे बराच काळ बंद आहेत. त्याची चौकशी करून ते उघडले पाहिजे, जेणेकरून तेथे काय होते आणि काय नाही हे कळू शकेल. त्याची योग्य चौकशी झाल्यानंतरच हे सर्व तथ्य समोर येईल’, असे खासदार दिया कुमारी म्हणाल्या.
ट्रस्टकडील कागदपत्रे-दस्तावेज
न्यायालयाला देण्याची तयारी
कागदपत्रांची गरज असेल, तर जयपूर राजघराण्याच्या आमच्या ट्रस्टमध्येही अनेक पुरावे उपलब्ध होऊ शकतात. न्यायालयाने आदेश दिल्यास संबंधित कागदपत्रे दिली जातील. शाहजहानला त्यावेळी हा राजवाडा आवडला आणि त्याने तो ताब्यात घेतल्याचे आमच्याकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट आहे. तिथे मंदिर होते का? या प्रश्नावर दिया कुमारी यांनी ‘मी अद्याप सर्व कागदपत्रे पाहिली नाहीत, परंतु ती संपत्ती आमच्या कुटुंबाची आहे’ एवढेच सांगू शकेन, असे सांगितले.
याचिकेद्वारे सर्वेक्षणाची मागणी
अयोध्येतील भाजप नेते डॉ. रजनीश सिंह यांनी ताजमहाल संदर्भात उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आपल्या याचिकेत डॉ. सिंह यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) ताजमहालच्या बंदावस्थेतील खोल्या उघडून सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. ताजमहालमध्ये हिंदू देवी-देवतांची शिल्पे आणि शिलालेख असू शकतात. सर्वेक्षणाअंती ताजमहालमध्ये हिंदूंच्या मूर्ती आणि शिलालेख आहेत की नाही? हे रहस्य उलगडू शकते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
ताजमहालसंबंधी महत्त्वाच्या नोंदी…
1965 ः इतिहासकार पी. एन. ओक यांनी पुस्तकात ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचा दावा केला.
2015 ः आग्राच्या दिवाणी न्यायालयात ताजमहालला ‘तेजो-महालय’ मंदिर घोषित करण्यासाठी याचिका दाखल.
2017 ः भाजप नेते विनय कटियार यांची ताजमहालला ‘तेजो-महाल’ घोषित करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.