वार्ताहर / कणकुंबी
जांबोटी, बैलूर व कणकुंबी भागातील यावषीच्या गणेशोत्सवाला विद्युत खात्याच्या अंधाराचे ग्रहण लागले असून बुधवारपासून जांबोटी भागातील सुमारे 40 गावे अंधारात आहेत. केवळ पाच ते सहा तासासाठी वीज होती. मात्र त्यानंतर वीज पुन्हा गायब झाल्याने गणेश भक्तामध्ये विद्युत खात्याबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. आमच्या भागात गणेशोत्सवात गणेशाचे नव्हे तर अंधाराचे साम्राज्य असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या ना त्या कारणाने वारंवार खंडित विद्युतपुरवठा देणाऱया विद्युत खात्याच्या कारभाराला जनता कंटाळलेली असून बुधवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झालेला असताना वीज मात्र गायब झाल्याने सर्वांच्या आनंदावर विरजण पडले आहे. गणेश चतुर्थी दिवशी म्हणजे बुधवारी पाचच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे जी वीज गायब झाली, ती गुरुवारी पहाटे दाखल झाली. त्यानंतर पुन्हा गुरुवारी दुपारी वीज गायब झाली आणि गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले. वास्तविक पहिले तीन-चार दिवस गणेश भक्तांचा उत्साह फार मोठा असतो. घरोघरी गणपतीचे पूजन, सत्यनारायण महापूजा, इतर धार्मिक विधी आणि परगावाहून आलेली पाहुणे मंडळी पाहायला मिळतात. विद्युत रोषणाईने घर सजलेले असते. कामानिमित्त बाहेर गावी असणारी सर्व मंडळी आपापल्या गावी येतात. होळीनंतर या भागातील हा एक प्रमुख सण मानला जातो. कामानिमित्त परगावी असलेले अनेक नागरिक गणेश चतुर्थीला आपल्या मूळ गावी येऊन आनंदाने पाच-सहा दिवस घालवतात.
अशा वातावरणात विद्युत खात्याने जर सुरळीतपणे विद्युतपुरवठा केला तर गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण येते. नाहीतर एवढा खर्च करून सर्व वाया अशा तीव्र प्रतिक्रिया गणेश भक्तातून व्यक्त केल्या जातात.
या भागात विशेषतः पावसाळय़ाला सुरुवात झाल्यानंतर गणेश चतुर्थीपर्यंत या ना त्या कारणाने वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत असतो. परंतु सणासुदीला तरी विद्युत खात्याने सुरळीतपणे वीजपुरवठा करून नागरिकांच्या उत्साहाला द्विगुणित करण्यासाठी सहकार्य करण्याच्या अपेक्षा गणेशभक्तातून व्यक्त होत असतात. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून जांबोटी भागातील वीजसमस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली असून फक्त पावसाळाच नव्हे तर बारा महिने विद्युत खात्याचे रडगाणे सुरू असल्याचे मत काही त्रस्त नागरिकांनी व्यक्त केले. या बाबतीत प्रशासन सुस्त तर सर्व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.