मान्सून तोंडावर आला. महाराष्ट्रात अजून काहींच्या उसाला तोड आलेली नाही. शेतकऱयांची लूट आणि फसवणूक सुरुच आहे. विद्राव्य खतात भेसळ, फाऊंडेशन बियाणे उपलब्ध नाही. खत, बियाणे, औषधे यामध्ये लिंकिंग आणि पाऊस व हवामान यांचे तडाखे यात भर, महापुराच्या भीतीची असे दृष्टचक्र वर्षानुवर्षे सुरु आहे. नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित व्हा,महापुराचा धोका आहे. नुकसानीला जबाबदार नाही वगैरे नोटीसा बजावण्यात शासकीय पातळीवर धन्यता मानली जात आहे. महापुराचे सांगली-कोल्हापूर आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्राला फटक्यामागून फटके बसूनही सरकारी पातळीवर काहीही ठोस, परिणामकारक झालेले नाही. कोल्हापूर, सांगली, पंढरपूरसह कृष्णा-वारणा-पंचगंगा नदीचा काठ व कृष्णा खोऱयात भितीचे वातावरण आहे. पुणे-बंगलोर महामार्गाची उंची, वेगवेगळे पूल, नदीपात्रातील अतिक्रमणे, नदी-नाले, ओढे स्वच्छता, वाळू उपसा याचबरोबर धरणे, धरणाचा पाणीसाठा, विसर्गाचे वेळापत्रक, समन्वय, पावसाचा अंदाज असे अनेक विषय महापूर या विषयाशी जोडले गेले आहेत. गतवर्षी महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात समन्वय दिसला पण तो महापुराचा तडाखा रोखू शकला नाही. महापुरासंदर्भात वडनेरे समितीने शासनाला अहवाल दिला आहे. नदी पात्रातील अतिक्रमणे आणि शेत जमिनीत भर टाकून वाढत असलेली नागरी वस्ती यांचा नगररचना व सुव्यवस्था यासाठी कोणताही विचार होत नाही. यंदा पंढरीची वारीही आहे आणि मान्सूनने लवकर वर्दी देण्यासाठी धडपड सुरु केली आहे. यासाऱया पार्श्वभूमीवर गेले वर्षभर व आता तातडीने जी पावले उचलायची ती उचलली गेलेली नाहीत. राजकीय पक्ष व नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यात, एकमेकांची उणीदुणी काढण्यात व भोंगे व चालिसा पठणाच्या कुरघोडय़ात दंग आहेत. भोंगे व ध्वनी प्रदूषण सर्वपातळीवर बंद झाले पाहिजे आणि हा विषय राजकीय नाही हे लक्षात घेऊन तो जनहित लक्षात घेऊन संपवला पाहिजे. राजकारण राजकारणाच्या पातळीवर, धर्मकारण धर्मकारणाच्या पातळीवर व सामाजिक सार्वहित सर्व पातळीवर जपले पाहिजे. शेजारी श्रीलंकेत जी अराजकता सुरु आहे ती सर्वांनी अभ्यासली पाहिजे. तेथे सत्तारुढ, विरोधी व राजकारणी सर्वांना जनतेने लक्ष केले आहे. लोक नेत्यांची घरे जाळत आहेत. मोडतोड आणि विध्वंस करत आहेत. प्रचंड महागाई, गैरकारभार आणि भूक यातून झालेला हा उठाव आहे. जनतेला सारे राजकारणी तेथे सारखे दिसत आहेत आणि पोटातील आग त्यांना हिंस्त्र बनवते आहे. आणीबाणी वगैरे उपाय सुरु आहेत. पण राजकारण हे केवळ सत्ताकारण आणि वसुलीचे बनले आणि टोप्या कसल्याही रंगाच्या असल्या पण वृत्ती एकच असली तर काय प्रक्षोभ माजतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपला रुपया विक्रमी घसरला आहे. बेरोजगारी रोज वाढते आहे. उच्चशिक्षित मुले घरात बसून आहेत. उद्योग-व्यवसाय मंदीच्या दाट छायेत आहेत. राजकीय मंडळींना कोर्ट-कचेऱया मोर्चे, वसुली-भानगडी, इडी यातून सवड नाही. राज्यातली मंडळी केंद्राकडे आणि केंद्रातली मंडळी राज्याकडे बोट दाखवून घरे भरत आहेत. महापुराचा प्रश्न आहे. पावसाळा पूर्व नालेसफाईचा प्रश्न असो, वडनेरे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी असो अथवा मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाचे विषय असोत राज्यकर्त्यांचे लक्ष नाही, असे खेदाने म्हणावे लागते. रोज नवा विषय समोर येतो आहे. मशिदीवरचे भोंगे हा जसा विषय आहे तसा राजकीय भोंगे हा सुद्धा विषय आहे. अयोध्येत कोण जाणार? खरे हिंदुत्व कुणाचे?असली कोण नकली कोण? असे विषय खूपच तापवले जात आहेत. करमणूक या पलिकडे सामान्य माणसांना यात रस नाही. पण मशिदीवरचे भोंगे जसे मंदावले तसे राजकीय भोंगेही मंदावले पाहिजेत आणि एकमेकांकडे बोटे न दाखवता शेती, शेतकरी, युवक, रोजगार या विषयावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कालच राज ठाकरे यांनी आपले बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आणि सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी आलेला नाही याची जाणीव करुन दिली. राज ठाकरे यांचे हे पत्र जळजळीत व खुले आहे. आता राज ठाकरेंची सभा मग उत्तर सभा हे जसे ठरलेले तसे या पत्राला उत्तरही जाईल आणि ते ठाकरी भाषेत असेल हे वेगळे सांगायला नको. या सर्व प्रकरणात भाजपाची डबल ढोलकी वाजताना दिसते आहे. राज्यात मुंबईत राज ठाकरे, त्यांची भूमिका चांगली आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांना पाय ठेऊ देणार नाही. अर्थात त्यामागेही राजकारण आहे. आता आदित्य ठाकरे अयोध्येला निघाले आहेत. काही दिवसापूर्वी रोहित पवार अयोध्येत सहकुटुंब जाऊन आले. राज ठाकरे हे करारी आहेत ते जाणार म्हणजे जाणार. त्यांना रोखणे एकवेळ अयोध्येत शक्य असले तरी त्याचे मुंबईत जे परिणाम होतील ते परप्रांतियांना न सोसवणारे असतील त्यामुळे हा वाद शमेल. पण ठाकरे बंधुतील राजकीय वाद आणि लेटरबॉम्ब सुरुच राहतील. मुख्यमंत्री आता थोडे हिंडायला-फिरायला लागलेत. त्यांनी मास्क उतरवला आहे आणि इतरांचा मास्क उतरवणार अशी भाषा आरंभली आहे. यातच शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था महाआघाडी म्हणून लढवायच्या की स्वतंत्र लढून नंतर एकत्र यायचे यावर राष्ट्रवादी काँग्रेस विचार करते आहे, असे म्हटले आहे. काँग्रेसचे नाना पटोले राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असे सांगू लागले आहेत. भंडारा, गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपा सोबत हात मिळवणी केल्याने नाना पटोले महाआघाडीच्या भ्रमातून सावध झाले आहेत. पाठीत सुरा भोसकण्याचा काँग्रेसला हा काही पहिला अनुभव नाही. वसंतदादा पाटील सरकारच्या पाठीतही याच मंडळींनी सुरा भोसकला होता तर राज्यात राजकीय करमणूक सूड-प्रतिसूड, चिखलफेक जोरात सुरु आहे, सुरु राहणार आहे. लोकांच्या प्रश्नात, खरीप हंगामाच्या तयारीत, महापुराच्या प्रश्नात, पर्यावरणाच्या प्रश्नात, बेरोजगारी, मंदी, महागाईच्या प्रश्नात कोण लक्ष घालणार हे महत्वाचे आहे. श्रीलंकेने टोक गाठले. आपल्यावर ती वेळ आलेली नाही. येणार नाही पण राजकारण हे लोकहितासाठी हे सूत्र विसरले तर काहीही होऊ शकते. श्रीलंकेकडून तोच धडा घेतला पाहिजे.
Next Article १२ मे ला पुण्यात जाहीर करणार दिशा:संभाजीराजे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.