बहुतांशी ग्रंथालयांची दुरवस्था : वाचनप्रेमी नाराज : सुविधा पुरविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रंथालयांची अवस्था बिकट झाली आहे. बहुतांशी ग्रंथालयांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रंथालयांना उतरती कळा लागली आहे. त्यामुळे वाचनप्रेमींतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
जिल्हय़ातील ग्रामपंचायत व्याप्तीत 464 सार्वजनिक ग्रंथालये आहेत. यापैकी बहुतांशी ग्रंथालयांच्या इमारतींची दुर्दशा झाली आहे. काही ग्रंथालयांची पडझड झाली आहे. गळक्या ग्रंथालयांमुळे पुस्तके वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. परिणामी वाचकांची संख्या झपाटय़ाने घटली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक ग्रंथालयांची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाचकांसमोर वाचायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हय़ातील काही सार्वजनिक ग्रंथालयांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्या धोकादायक बनल्या आहेत. अशा ग्रंथालयांमध्ये वाचन करणे धोक्मयाचे बनले आहे. तातडीने ग्रंथालयांच्या इमारतींचा सर्व्हे करून दुरुस्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. काही ग्रंथालयांमध्ये पुस्तकांचा अभाव दिसून येतो. स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहर गाठावे लागत आहे. सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करा, अशी मागणीही विद्यार्थ्यांतून होत आहे.
जिल्हय़ातील सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी आदी तालुक्मयांतील ग्रंथालयांमध्ये पुस्तकांचा अभाव दिसून येतो. काही ठिकाणी डिजिटल ग्रंथालये आहेत. मात्र, पुस्तके नाहीत, अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी ग्रंथालये दिवसभर कुलूपबंद असतात.
खानापूर तालुक्मयात 40 ग्रंथालये आहेत. सर्व मराठी भाषिक आहेत. मात्र, ग्रंथालयात पुस्तके कन्नड आहेत. त्यामुळे ग्रंथालये कुचकामी ठरताना दिसत आहेत. यासाठी ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत, त्या ठिकाणी मराठी पुस्तके उपलब्ध करा, अशी मागणी होत आहे.
टप्प्याटप्प्याने विकास करणार
ग्रामपंचायत पातळीवर 132 डिजिटल ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी संगणक, बुद्धिबळ आणि इतर गोष्टीही पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला वाव मिळत आहे. शिवाय साहित्य प्रकार आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने इतर ग्रंथालयांचा विकास केला जाणार आहे.
– दर्शन एच. व्ही. (सीईओ, जिल्हा पंचायत)