गरज नसताना होणारे नुकसान कोण भरून काढणार ?
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
यमनापूरमधील सर्व गल्ल्यांतील खांबांवरील विद्युत दिवे शनिवारी दिवसभर सुरूच राहिल्यामुळे हेस्कॉम खात्याला दिवसाही रात्रच दिसत आहे की काय? या भागात अशा घटना वरचेवर घडत असल्यामुळे या नुकसानीला जबाबदार कोण? असे संतापजनक प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. या गावातील खांबांवरील विद्युत दिवे शनिवारी सकाळी आठनंतरही सुरूच होते. या गावात विद्युत दिवे दिवसाही सुरू राहण्याच्या घटना वरचेवर घडत असतात. तेव्हा हेस्कॉम खात्याचे अधिकारी दिवसाही झोपतात की काय? तसेच गरज नसताना विजेचे नुकसान होते, हे नुकसान कोण भरून काढणार, असेही प्रश्न नागरिकांतून उमटत आहेत. हेस्कॉमने अशा घटनांवर प्रकाशझोत टाकून होणारे विजेचे नुकसान टाळणे गरजेचे आहे.
हेस्कॉमला दंड कोण लावणार?
जर एखाद्या ग्राहकाने घरगुती विद्युत बिल भरण्यास थोडा विलंब केला तर हेस्कॉमचे कर्मचारी त्यांचे विद्युत कनेक्शन तोडतात. विचारल्यास आम्हाला वरिष्ठ अधिकाऱयांकडून तशी सूचना आहे, असे उत्तर देतात. परंतु या ठिकाणी सकाळी नऊ वाजेपर्यंत तर कधी नऊ नंतरही विद्युत दिवे सुरू ठेऊन हेस्कॉम खाते विजेचे नुकसान करते. या नुकसानीला जबाबदार कोण आणि यांना दंड कोण लावणार, अशीही संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त हेत आहे.
हेस्कॉम खात्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांनी गरज नसताना विद्युत दिवे सुरू ठेऊन होणाऱया नुकसानीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. वीज जपून वापरा, पाणी जपून वापरा या घोषवाक्यांची आठवण करून सकाळी विद्युत दिवे बंद करून हेस्कॉम खात्याला सहकार्य करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.