ड्रिलिंगच्या मार्गात लोखंडी सळ्या मिळाल्याने खोदकामात व्यत्यय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, उत्तरकाशी
उत्तरकाशी सिलक्मयारा बोगद्यात अडकलेल्या 41 जीवांच्या सुटकेची आतुरता वाढतच चालली आहे. प्रत्येकजण आनंददायी बातमीची वाट पाहत आहेत. ड्रिलिंगचे काम सुरू असून ते अजूनही पूर्ण न झाल्याने कामगारांच्या बाहेर पडण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. ड्रिलिंगच्या कामातील अडथळ्यांमुळे कामगार बाहेर येण्याची प्रतीक्षा वाढतच जात आहे.
बोगद्याच्या बाहेर कुटुंबातील सदस्य आपल्या प्रियजनांना बाहेर काढण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बुधवारपासून सुरू झालेल्या कारवाईचा वेग पाहता गुऊवारी सकाळपर्यंत सर्व 41 कामगार सुखरूप बाहेर येतील, अशी अपेक्षा होती. मात्र रात्रीच्या सुमारास अमेरिकन ऑजर ड्रिल मशिनच्या मार्गात लोखंडी सळ्या सापडल्यामुळे ड्रिलिंगमध्ये व्यत्यय निर्माण झाला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळपर्यंत कामगार बाहेर पडण्याची शक्मयता व्यक्त केली जात होती. मात्र, ती मुदतही आता मागे पडली आहे. आतापर्यंत ड्रिलिंगच्या माध्यमातून नऊ पाईप आत पाठवण्यात आले आहेत. अजूनही दोन-तीन पाईप ड्रिलिंगद्वारे आतमध्ये सरकवावे लागतील, असे पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी सांगितले. सध्याच्या नियोजनानुसार ड्रिल मशिनने सुयोग्यपणे काम केल्यास पाईप बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या अगदी जवळ पोहोचेल, असेही सांगण्यात आले.
मुख्यमंत्री-पंतप्रधानांमध्ये चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी बोलून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्यात येणाऱ्या अडथळ्यांची सविस्तर माहिती घेतली. यासोबतच बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर कामगारांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि गरज भासल्यास त्यांना ऊग्णालयात किंवा घरी पाठवण्यासह सर्व व्यवस्था करण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज मुख्यमंत्री धामी यांना फोन करून सिलक्मयारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेत आहेत.
न्यू ऑस्ट्रियन टनेल पद्धतीचा वापर करून सध्या ड्रिलिंगचे काम केले जात आहे. ऑगर मशीनसमोर लोखंडी सळ्या आल्याने कामात अडथळे येत असल्याचे शुक्रवारच्या संभाषणात मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. तसेच बोगद्यात अडकलेल्या कामगारांची स्थिती आणि त्यांना दिले जाणारे अन्न आणि दैनंदिन जीवनोपयोगी वस्तू, तसेच मदत आणि बचावकार्यात गुंतलेल्या कामगारांची स्थिती आणि सुरक्षा उपायांची माहिती घेतली. कामगार बोगद्यातून बाहेर पडताना त्यांची आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सेवेकडे विशेष लक्ष देण्याची सूचना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यांनी बचाव कार्याची प्रगती व चालू असलेल्या कामाची तसेच विविध यंत्रणांमधील समन्वय व इतर सहकार्य याबाबत माहिती घेतली. तसेच कामगारांच्या कुटुंबीयांची माहिती घेतली.
6 इंच व्यासाची पाईपलाईन यशस्वीपणे टाकल्यानंतर पर्यायी लाईफलाईन तयार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याद्वारे ताजे शिजवलेले अन्न, फळे, सुका मेवा, दूध, ज्यूस तसेच डिस्पोजेबल प्लेट्स, ब्रश, टॉवेल, छोटे कपडे, टूथपेस्ट, साबण आदी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाठवल्या जात आहेत. कामगारांच्या अन्न-पोषणाच्या समस्येबाबत आता कोणतीही चिंता नसली तरी त्यांच्यापर्यंत प्रकाश किंवा उजेड पोहोचू शकत नसल्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका व्यक्त होत आहे. तथापि, एसडीआरएफने स्थापन केलेल्या कम्युनिकेशन सेटअपद्वारे आरोग्य कर्मचारी किंवा अन्य यंत्रणा कामगारांशी नियमित संवाद साधत आहेत. या माध्यमातून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणेही केले जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे मानसोपचारतज्ञ नियमितपणे समुपदेशन करत आहेत.
बचावकार्यात केंद्रीय यंत्रणांशी उत्तम समन्वय राखण्यासाठी राज्य सरकारने सिलक्यारामध्ये सचिव स्तरावरील अधिकारी तैनात केला आहे. उत्तरकाशी जिल्हा प्रशासन आणि राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कटिबद्ध आहे. कामगारांच्या कुटुंबांचीही सरकार काळजी घेत आहे. कुटुंबातील सदस्यांची निवास, भोजन, कपडे आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्यांच्या समन्वयासाठी आणि त्यांच्या सुविधांसाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर स्वतंत्र अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.