► वृत्तसंस्था / भुवनेश्वर
ओडीशाच्या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचा पराभव झाला आहे. लोकसभा निवडणुकीतही या पक्षाचा 21 पैकी 20 मतदारसंघांमध्ये पराभव झाला आहे. हा जनादेश आपण सन्मानाने आणि खिलाडू वृत्तीने स्वीकारावयास हवा. या पराभवानंतरही आपण ओडीशाच्या जनतेची सेवा करीत राहू, असे प्रतिपादन या राज्याचे मावळते मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शनिवारी एका मुलाखतीत केले.
पटनाईक यांनी ओडीशाचे मुख्यमंत्रीपद सलग 24 वर्षे सांभाळले. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा भारतीय जनता पक्षाने पराभव केला. विधानसभेच्या 147 जागांपैकी 78 जागा प्राप्त करुन भारतीय जनता पक्षाने प्रथमच राज्यात पूर्ण बहुमत मिळविले आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळाल्याचे दिसून येत आहे.
चांगले काम केले
आमच्या 24 वर्षांच्या सत्ताकाळात आम्ही राज्यातील जनतेसाठी नेहमीच उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न केला. आमच्या सत्ताकाळात राज्याचा विकास झाला. तसेच राज्यातील गरीबी मोठ्या प्रमाणात दूर झाली. इतर सुधारणाही मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आता प्रदीर्घ काळानंतर जनतेला अन्य पक्षाचे सरकार हवे असेल, तर आम्ही जनतेच्या या इच्छेचा सन्मान करावयास हवा. आपले सरकार निवडण्याचा अधिकार जनतेला असतोच. मी मुख्यमंत्री या नात्याने केलेल्या कामाच्या संदर्भात समाधानी आहे, असेही नवीन पटनाई यांनी स्पष्ट केले.