जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांचे मत : पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
माध्यमे ही आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. वृत्तपत्रांशिवाय आपली सकाळ पूर्ण होत नाही. मंगळूर समाचार या पत्रिकेपासून कर्नाटकातील वृत्तपत्र क्षेत्राला सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्यलढय़ात वृत्तपत्रांनी मोलाची भूमिका बजावली. वृत्तपत्रे ही माहितीचे भांडार असल्यामुळे कोणतीही स्पर्धा परीक्षा असो वृत्तपत्रांचा अभ्यास हा करावाच लागतो. माध्यमे ही समाजाचा आरसा असून, काय वाईट, काय चुकीचे हे आपल्या लिखाणातून दाखवून देतात. त्यामुळेच लोकशाहीचा चौथा खांब म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते, असे विचार जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी मांडले.
कर्नाटक श्रमिक पत्रकार संघ जिल्हा शाखा व माहिती आणि सार्वजनिक संपर्क खात्याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केएलई शताब्दी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, शिक्षणतज्ञ डॉ. गुरुराज करजगी, गोकाक येथील लक्ष्मी शिक्षण संस्थेचे सर्वोत्तम जारकीहोळी, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, राजशेखर पाटील, श्रीशैल मठद, यल्लाप्पा तळवार, अरुण पाटील, तानाजीराव मुंगणकर, चेतन होळप्पगोळ, शहर शिक्षणाधिकारी नवी बजंत्री, मंजुनाथ पाटील आदी उपस्थित होते.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून बेळगाव परिसरात उत्तम सेवा बजावलेल्या ज्ये÷ पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचबरोबर पत्रकारांच्या गुणवंत मुलांचाही गौरव करण्यात आला. प्रारंभी स्फूर्ती मास्तीहोळी यांनी मानसिक ताणतणावातून बाहेर कसे पडायचे, याविषयी माहिती दिली. संजीव कानडे यांनी गणेशवंदन केले. शिवानंद तारिहाळ यांनी प्रास्ताविक केले.