दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पंधरा वर्षांच्या निर्विवाद सत्तेला सुरुंग लावत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सत्ता हस्तगत केली आहे. 42 टक्के मतांसह 131 जागा जिंकून पुढचा महापौर आपलाच असणार हे ‘आप’ने सिद्ध केले आहे. पाठोपाठ 39 टक्के मते मिळवून भाजपने 106 तर 12 टक्के मते मिळवून काँग्रेसने अवघ्या आठ जागा मिळवल्या आहेत. दिल्लीची महापालिका ही देशाच्या राजधानीची आणि जगातील सर्वात मोठय़ा महापालिकांपैकी एक आहे. सांगली, कोल्हापूर सारख्या डझनभर महापालिकांइतका विस्तार आहे. यापूर्वी पंधरा वर्षाची काँग्रेसची सत्ता घालून भाजपने तिथे पंधरा वर्षे राज्य केले आहे आणि यंदाच्या निवडणुकीत आकाश पाताळ एक करून सुद्धा त्यांना ती आम आदमी पक्षाच्या हाती जाण्यापासून वाचवता आली नाही. निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला प्रतिस्पर्धी पक्ष कोण असेल ते हेरले होते. पंजाब विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या धरतीवर मोफत वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या घोषणेला मिळालेला प्रतिसाद जाणून गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिकेची निवडणूक घोषित होतानाच मोदी यांनी ‘रेवडी कल्चर’ देशाला धोकादायक आहे. असे वक्तव्य करून लोकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाढत्या महागाईच्या काळात लोकांना केजरीवाल यांच्या या घोषणांचे मोल अधिक वाटत असावे. हिमाचल प्रदेशमध्ये आप लढलीच नाही. पण दिल्लीत भाजपचा पराभव का झाला? याचा विचार करणेही आवश्यक आहे. दिल्ली राज्यावर केजरीवाल यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत त्यांची डाळ शिजली नव्हती. यावेळी तर त्यांच्या विरोधात दारू लायसन्स घोटाळा, मंत्री सत्त्येंद्र जैन यांना अटक, त्यांच्या जेलमधील मसाजचे व्हिडिओ व्हायरल होणे, मनीष सिसोदियांसह अनेकांवर ईडीचे छापे अशा पद्धतीने भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे पुढे आले होते. मात्र भाजपच्या या सर्व आरोपांचा निवडणुकीत टिकाव लागला नाही. याचे कारण काय? पंधरा वर्षे सलग सत्ता असल्याने सत्ताविरोधी वातावरण तयार झाले होते. हे तर होतेच. मात्र, त्याचबरोबर दिल्लीतील कचऱयाचे ढीग, अस्वच्छता, दुर्गंधी, कारभारातील बेफिकिरी आणि भ्रष्टाचार याबाबतीत भाजपवर खूपच आरोप झाले. केजरीवाल यांनी त्याला मुख्य मुद्दा केला. त्याशिवाय आपल्या पक्षाच्या साधेपणाचा प्रसार केला. मात्र त्याला उत्तर देण्याऐवजी भाजपने त्यांच्या आपवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात वेळ घालवला. आपल्या नेत्यांच्या विरोधात जाणून-बुजून ईडीची कारवाई, भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत हे लोकांना पटवून देण्यात आणि स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करण्यात केजरीवाल यशस्वी झाले. खरंतर याबाबतीतील भाजपची प्रचार यंत्रणा देशातील सर्व राजकीय पक्षांवर भारी आहे. मात्र तरीही, केजरीवाल यांनी त्यावर मात करून दाखवली. आपवर केले जाणारे प्रत्येक आरोप बिन बुडाचे आहेत, हे ते ज्या आत्मविश्वासाने सांगत होते त्याला टक्कर देणे भाजपला जमले नाही. आता आपपुढे 2024 सालची लोकसभा आणि पाठोपाठ दिल्ली विधानसभेत चमत्कार दाखवण्याचे आव्हान आहे. देशात काँग्रेस नव्हे तर केजरीवाल हेच मोदी यांना पर्याय आहेत असा त्यांनी प्रचार सुरू केला आहेच. अवघ्या दहा वर्षे वयाच्या राजकीय पक्षाची दिल्ली, पंजाब अशा दोन राज्यात निर्विवाद सत्ता, तब्बल दहा खासदार आणि उद्या गुजरात निवडणुकीत अवघ्या दोन जागा जरी मिळाल्या तरी राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याइतपत प्रतिमा तयार झाली आहे. हा पक्ष काँग्रेसची मते खातोच आहे. पण, आता तो भाजपला आव्हान देऊ लागला आहे. दिल्लीत दोन विधानसभा नंतर महापालिका निवडणुकांमध्येही त्यांनी भाजपला हात दाखवला आहे. दिल्लीत मोडतोड करून सत्ता उलथवू, या भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या फुशारक्मया सात वर्षात वारंवार फसल्या आहेत. महापौर आमचा होईल असे ते म्हणत आहेत कारण इथे पक्षांतर्गत बंदी कायदा लागू नाही. मात्र तसे झाले तर दिल्लीत भाजपच्या प्रतिमेला गालबोट लागेल. तिथला सुशिक्षित, मध्यमवर्गीय मतदार जो विधानसभेला मोठय़ा संख्येने आम आदमी पक्षाला पाठबळ देत आहे त्याला लोकसभेवेळी दुखावणे भाजपला परवडणार नाही. एक मात्र निश्चित की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ज्या प्रभागात राहतात तिथे आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष राहतात तिथे तसेच मंत्री सत्येंद्र जैन यांच्या विधानसभा क्षेत्रातील तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार जिंकले. खुद्द अरविंद केजरीवाल यांच्या चांदणी चौक परिसरात आपचा उमेदवार अधिक पिछाडीवर होता. नंतर खूप उशिरा त्याने विजय मिळवला. म्हणजे दिल्लीच्या सर्व विभागात यश मिळवत असताना आधीच्या मतदारांनी मात्र चांगलीच हुलकावणी दिली आहे. केजरीवाल मॉडेलचे देशभरात आकर्षण आहे. त्याचा बोलबाला करत कार्यकर्ते देशभर वातावरण निर्मितीच्या कामाला लागले आहेत. गुजरात निवडणुकीत आमची सत्ता येणार असे स्टॅम्प पेपरवर लिहून देणारे केजरीवाल यांचा कितपत प्रभाव गुजराती जनतेवर पडला? हे गुरुवारी दिवसभरात स्पष्ट होईलच. केजरीवाल यांची जशी लोकप्रियता आहे तशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या गृहराज्यात आणि देशातील विविध विभागात लोकप्रियता आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या इतका लोकप्रिय उमेदवार समोर नाही म्हणून विरोधी आघाडीला नेतृत्व नाही असा प्रचार आतापर्यंत भाजपकडून होत आला आहे. 2014 आणि 19 च्या निवडणुकीनंतर 24 ची निवडणूक त्यासाठीच खूप महत्त्वाची आहे. सर्व प्रादेशिक शक्ती एकत्र आल्या तर मोदी यांना आपण पराभूत करू शकतो असे सांगत आतापर्यंत वेगवेगळय़ा प्रदेशातील यशस्वी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान पदासाठी आपले नाव रेटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यापैकी कोणा बाबतीतही एकमत घडू शकले नाही. राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी मोदी यांनी खेळलेल्या चालीमुळे विरोधकांचे एकत्रीकरण थंड पडले होते. गुजरात आणि हिमाचलमध्ये मतदानोत्तर चाचणीच्या जाहीर निकालाप्रमाणे निकाल लागू शकतात.
Previous Articleउपासना..1
Next Article निश्चलनीकरणासंबंधी ‘सर्वोच्च’ निर्णय राखून
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.