प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात अक्षय्य तृतीया उत्साहात साजरी झाली. ज्याचा कधीही नाश होत नाही ते अक्षय होय. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांचे पूजन तसेच पितरांचे स्मरण केले जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने खरेदीसुद्धा आवर्जून केली जाते. त्यामुळे बाजारपेठेत अक्षय्य तृतीयेची खरेदी तसेच ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बाहेर पडलेल्या बांधवांची गर्दी झाल्याने रस्ते फुलून गेले होते.
घरोघरी सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मी व विष्णूची पूजा केली. या दिवशी मोदक किंवा जलदान करण्याची प्रथा आहे. ज्यांना शक्मय आहे त्यांनी मोदक केले. अनेकांनी अन्य पदार्थांना पसंती दिली. बाजारपेठेत श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम यांची सुद्धा खरेदी झाली. विशेष म्हणजे नवीन वाहन खरेदीचा मुहूर्त अनेकांनी साधला आणि दुकानांच्या शोरुमनजीक किंवा मंदिरांच्या आवारात वाहनांची पूजा करताना पहावयास मिळाले.
काही घरांमध्ये महिलांनी उपवास केला. या दिवशी पाण्याचे मडके, पंखा, छत्री, जवस, गहू, तांदूळ, वस्त्र असे दान करण्याची प्रथासुद्धा पाळण्यात आली. अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सुवर्ण पेढींमध्ये बरीच गर्दी होती. ज्यांना सोने खरेदी करणे शक्मय नाही त्यांनी कवडय़ा खरेदी करून त्याची लक्ष्मीच्या बाजूला स्थापना करून पूजा केली. दुसरे दिवशी या कवडय़ा लाल वस्त्रात बांधून पैसे जेथे ठेवले जातात तेथे ठेवल्यास धनवृद्धी होते, अशी धारणा आहे. काही ठिकाणी सात प्रकारचे तेलाचे दिवे लावून पूजा केली.