गोव्यातील हवामान सध्या विचित्र बनलेले आहे. सोमवारी राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा गोमंतकीयांना झोडपून काढले. उकाडय़ाने हैराण झालेल्यांना दिलासा लाभला असला तरी या अवकाळी पावसाने विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली. याची झळ घरांना तसेच विद्युतवाहिन्यांना बसली. अनेक ठिकाणी वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठय़ावरही परिणाम जाणवला. पुन्हा एकदा गोमंतकीयांना नुकसानीला सामोरे जावे लागले.
गेल्या पंधरा दिवसांपासून गोव्यात उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेले नागरिक थंडाव्यासाठी विविध ठिकाणी जलसिंचन खात्यातर्फे उभारलेल्या बंधाऱयांच्या पाण्यात आंघोळ करतानाचे चित्र दिसून येते. खासकरून रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात नागरिकांचा मोर्चा नदीकिनाऱयांकडे वळलेला असतो. तसेच काही स्थानिक तसेच पर्यटक उन्हाळा असहय़ होत असल्याने आपले बस्तान समुद्रकिनाऱयांकडे वळवत आहेत. उन्हाळय़ाचा उकाडा असहय़ होत असताना विशेषतः सत्तरी तालुक्यातील केरी, मोर्ले भागातून वाहणाऱया गोडय़ा पाण्याच्या वाळवंटी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गोव्याच्या विविध भागांतील तरुणांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते. गटागटाने येणारे यातील बरेच तरुण दारूच्या नशेत नदी डोहात आंघोळ करताना दिसतात. दारूच्या नशेत नदी डोहात पोहणे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू शकते. तसेच काही पोहायला न येणारेही पाण्यात डुबकी मारतात. वाळवंटीचे बरेच डोह खोल असून त्यात बुडण्याची शक्मयता अधिक असते. दरम्यान, दूधसागर नदी पात्रात एक युवक बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना या महिन्यात घडली असताना वाळवंटी नदीतही असे प्रकार होऊ शकतात, त्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन अशा प्रकारांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी होत आहे.
1989 नंतर प्रथमच एप्रिल महिन्यामध्ये गोव्यातील उष्णतेने कहर केला. असहय़ उकाडय़ाने अंगाची लाही-लाही होत आहे. गोमंतकीय उन्हाळय़ात किमान एकदा समुद्रातील पाण्याने आंघोळ करतात व समुद्रकिनाऱयावर रात्री मुक्काम करून क्षारयुक्त हवा घेतात. ही फार प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे गोमंतकीय कामातून सवड मिळताच समुद्रकिनाऱयावर जाऊन आंघोळ करीत आहेत. जाणकारांनी हे समुद्रस्नान आरोग्यदायी मानले असल्यामुळे प्रत्येक गोमंतकीय वर्षातून किमान एकदा समुद्रस्नान करतो. त्यामुळे पर्यटकांबरोबरच गोमंतकीय लोकही समुद्रकिनाऱयावर जात असल्याने समुद्रकिनारे गजबजलेले दिसत आहेत.
दोन महिन्यांपासून सातत्याने पाऊस पडू लागला आहे. यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहे. याचे विपरित परिणाम राज्यातील काजू उत्पादनावर होताना दिसत आहेत. यामुळे गोवा राज्यातील काजू उत्पादकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याची भीती असून सरकारने यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन काजू उत्पादकांना आर्थिक पाठबळ देण्याच्यादृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. सरकारने काजू उत्पादकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. आंबा उत्पादनही संकटात आले आहे.
यंदाचे काजू उत्पादन अवघे 30 टक्के झालेले आहे. त्यामुळे काजू उत्पादकांची आर्थिक परिस्थिती खालावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार काजू मोसम जवळपास संपण्याच्या मार्गावर असतानासुद्धा फक्त 30 टक्केच काजू उत्पादन झाल्याचा उत्पादकांचा दावा आहे. अवकाळी पावसाचे विपरित परिणाम काजू उत्पादनावर होऊ लागले आहेत. सत्तरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात काजू उत्पादक आहेत. सुमारे 70 टक्के काजू उत्पादक आपले आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे काजू उत्पादनावर करतात. तीन महिन्यांच्या उत्पादनावर पूर्ण वर्षाचे व्यवस्थापन करण्यावर काजू उत्पादक भर देतात. अशा स्थितीत वातावरणातील बदल व अवेळी पडणारा पाऊस यामुळे काजू उत्पादन मोठय़ा प्रमाणात घसरले असून उत्पादकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याची भीती आहे. सरकारने यासंदर्भात गांभीर्याने विचार करून उत्पादकांना दिलासा देणे आवश्यक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोणता निर्णय घेतात, याकडे आता काजू उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
काणकोणपासून पेडणेपर्यंत गोव्यात काजूचे पीक घेतले जाते. असंख्य शेतकऱयांचे काजू पीक हे महत्त्वाचे पीक असून वर्षभराची गुजराण याच पीकावर केली जाते. मात्र, यंदा अनपेक्षितपणे काजूच्या पीकात घट झाल्याने असंख्य शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यात काजूला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे आता सरकारनेच काजू उत्पादक शेतकऱयांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दक्षिण गोव्यातील काणकोण, केपे, सांगे, धारबांदोडा, सावर्डे, फोंडा या भागात तर उत्तर गोव्यात सत्तरी, डिचोली, बार्देश, तिसवाडी, पेडणे या भागात काजूचे पीक घेतले जाते मात्र यंदा काजू पीकासाठी पोषक असे वातावरण तयारच झाले नाही. काजूला मोहर आला पण तो करपून गेल्याने शेतकऱयांच्या पदरी निराशाच आली. काजू बागायतीची साफ-सफाई करण्यासाठी शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात कामगारवर्गाचा वापर केला. त्यांच्यावर खर्च केलेला पैसासुद्धा यंदा भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यात काजूला चांगला भावही नाही.
विदेशातून काजू आयात केला जात असल्याने स्थानिक काजूचा दर कोसळला आहे. अशावेळी सरकारनेच यावर उपाययोजना आखावी, अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे. गोव्याच्या सर्वच भागात काजूच्या बोंडापासून मिळणाऱया रसावर प्रक्रिया करून हुर्राक व फेणीची निर्मिती केली जाते. त्यामुळे शेतकऱयांना थोडा-फार दिलासा मिळत असतो पण यंदा काजूचे पीकच घटल्याने हुर्राक व फेणीची निर्मिती करणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. सध्या ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही समस्या भेडसावत आहे. अवकाळी पावसामुळे गोमंतकीयांना बरेच नुकसान झालेले आहे. देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोव्यातील समुद्रकिनाऱयांवर असलेले शॅक्स (झोपडीवजा दुकाने) खरेतर मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू असतात मात्र अपेक्षेप्रमाणे विदेशी पर्यटक नसल्याने हा व्यवसाय सध्या मंदावला आहे. त्यामुळे शॅक्स व्यावसायिकांनी मार्च महिन्यापासूनच आपला गाशा गुंडाळला आहे. जणू पर्यटन हंगाम ओसरल्यातच जमा आहे. कोरोना सध्या नियंत्रित असला तरी एकंदरित एप्रिल महिना अवकाळी पावसाने तसेच वाढत्या उकाडय़ाने गोंयकारांसाठी तापदायक ठरला आहे. आगामी दिवस कसे असतील, याबाबत गोमंतकीय विवंचनेत आहेत.
राजेश परब