जनार्दन भंडारी, विकास भगत यांचा दावा : उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने टाळे ठोकले
प्रतिनिधी / काणकोण
श्रीस्थळ पंचायतीच्या भाटपाल प्रभागातील रस्त्यांचे रखडलेले डांबरीकरण त्वरित सुरू करण्यात यावे ही मागणी घेऊन उपोषणाला बसलेले पंच रामू नाईक यांना पाठिंबा देतानाच त्यासंबंधीची माहिती घ्यायला गेल्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी सविस्तर माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणूनच त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले आणि रामू नाईक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर कार्यालयाला लावलेले कुलूप काढण्यात आले. हा लोकशाहीविरोधी मार्ग नसून काणकोणवासियांच्या न्याय्य मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने केलेले आंदोलन आहे. यात सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याकडे आम्ही लक्ष दिले, असे काँग्रेसचे जनार्दन भंडारी आणि गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांनी चावडीवरील व्हिजन अँड मिशन कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्याला मिळालेली मुक्ती, घटकराज्याचा दर्जा, कोकणीला मिळालेला राजभाषेचा दर्जा, कोकण रेल्वेच्या जलद रेल्वेगाड्यांचा मिळालेला थांबा, विद्यार्थ्यांच्या बस तिकिटाचा प्रश्न हे केवळ आंदोलनामुळे सुटलेले विषय आहेत. सभापती रमेश तवडकर सोयीस्कररीत्या भूतकाळ विसरले आहेत. त्यांनी सुरू केलेले ‘उटा’चे आंदोलन हा देखील त्याचाच भाग आहे. या आंदोलनाचा व्यवस्थित राजकीय लाभ त्यांनी घेतला. त्या आंदोलनात केपे आणि काणकोण येथील दोन युवकांचा हकनाक बळी गेला. काणकोणवासियांचे प्रश्न आजवर आंदोलनाशिवाय कधीच सुटलेले नाहीत. आपला लढा जर लोकशाहीविरोधी मार्गाचा असेल, तर न्यायालय आपल्याला जी सजा देईल ती भोगण्याची आपली तयारी आहे, असे भंडारी यांनी सांगितले.
पोळे ते गुळेपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, बगलमार्गावरील ख•s बुजविणे, कदंब बसस्थानकावरील गळके छप्पर दुरुस्त करणे, नगर्से ते चार रस्तापर्यंतचा रस्ता सुधारणे हे प्रश्न केवळ आंदोलन केले म्हणून सुटले. खराब रस्त्यावरून एखादी रुग्णवाहिका नेल्यास रुग्णांचे काय हाल होतात हे दाखविण्यासाठीच यापूर्वी अभियंत्याला त्यात डांबून नेण्यात आले होते, असे भंडारी यांनी सांगितले. दरम्यान, 26 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्याच्या केबिनला कुलूप ठोकल्याप्रकरणी जनार्दन भंडारी आणि विकास भगत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रस्ता विभागाचे साहाय्यक अभियंता दिलीप केरकर यांनी पोलिसांत तक्रार दिलेली आहे.
सभापतींकडून सुडाचे राजकारण : भंडारी
विद्यमान सभापती केवळ वैयक्तिक कारणापोटी सुडाचे राजकारण करत आहेत आणि आपल्यावर गुन्हा दाखल करावा असे पोलीस निरीक्षकांना फर्मावत आहेत, असा आरोप यावेळी भंडारी यांनी केला. आपला पक्ष अनुसूचित जमातींना आरक्षण मिळावे म्हणून झगडत आहे. मात्र त्यात कोण खो घालत आहे त्याची पूर्ण कल्पना एसटी समाजाला आहे, असे भगत म्हणाले. काणकोणवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा चालूच राहील, असे भगत आणि भंडारी यांनी स्पष्ट केले.