काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचे नेते शशी थरूर यांनीही मैदानात उतरण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी मतदान होण्याची शक्यता बळावली असून, या निवडणुकीत कधी नव्हे इतकी रंगत निर्माण होऊ लागल्याचे दिसत आहे. राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे, यासाठी राज्याराज्यात करण्यात आलेले ठराव, अंतस्थरीत्या राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दिली जाणारी पसंती व शशी थरूर यांची एन्ट्री या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष कोण होणार, याबाबत गूढ वाढल्याचे पहायला मिळते. ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या राजकारणाशी पूर्ण वेळ जोडले गेले आहेत. मागच्या आठ वर्षांचा विचार करता त्यांच्या एकूणच राजकीय वाटचालीत सातत्य दिसले नाही, ही वस्तुस्थिती होय. तथापि, आता ते थेट जनतेत उतरल्याने त्यांनी राजकारण गांभीर्याने घेतले असावे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा केरळातील तिरुअनंतपूरम व अन्य भागांतून कर्नाटक, महाराष्ट्रातील नांदेड, जळगाव असा प्रवास करीत मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. सध्या या यात्रेने दक्षिणेतील वातावरण ढवळून काढल्याचे चित्र गलितगात्र काँग्रेससाठी सुखावह म्हणता येईल. तामिळनाडू व केरळमध्ये या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता काँग्रेसजनांच्या आशा पल्लवित न झाल्या तर नवलच. अर्थात पुढच्या टप्प्यात ‘भारत जोडो’ला कसा प्रतिसाद मिळणार, उत्तरेतील वातावरण कसे राहणार, यावर बऱयाच गोष्टी अवलंबून असतील. काही का असेना. ही यात्रा, त्यामध्ये ठसणारा राहुल यांचा चेहरा पाहता पक्षांतर्गत विरोधाची धार बऱयाच अंशी कमी होऊ शकते, असे म्हणायला वाव आहे. स्वाभाविकच राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशा प्रकारचे ठराव राज्याराज्यांमध्ये मंजूर झाल्याचे पहायला मिळतात. राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा काही राज्यांचा यात समावेश होतो. असे असले, तरी राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेणार, याला अधिक महत्त्व असेल. 2017 ते 19 या कालावधीत त्यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद होते. किंबहुना, त्यांनी पदत्याग केल्यापासून सोनिया गांधी याच पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. राहुल यांना अनेकदा गळ घालूनही त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दर्शविलेला असून, त्यांचे ताजे वक्तव्यही असाच संभ्रम वाढविणारे म्हणता येईल. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अध्यक्षपदाबाबत प्रश्न विचारा, या विधानाचा नेमका अर्थ होकारार्थी घ्यायचा की नकारार्थी, याचे उत्तर आत्ताच देणे, घाईचे ठरेल. तरीदेखील गांधीतर अध्यक्ष देण्याची भूमिका घेतली गेली, तर नक्कीच दुसऱया नावाचा विचार होऊ शकतो. राहुल गांधींनंतर सध्या अशोक गेहलोत व शशी थरूर या दोघांचीच नावे अध्यक्षपदाकरिता चर्चेत दिसतात. सोनिया गांधी परदेशातून परतल्यानंतर थरूर यांनी त्यांची घेतलेली भेट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. या भेटीत राहुल गांधी निवडणूक लढणार नसल्यास आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याची माहिती पुढे येत आहे. थरूर यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख असून, अभ्यासू व आश्वासक नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांना अध्यक्षीय निवडणूक लढविण्यास सोनिया यांनी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जाते. मात्र, या निवडीत गांधी कुटुंब तटस्थ राहील, असेही वृत्त आहे. वास्तविक, अशोक गेहलोत यांच्या नावाकरिता काँग्रेस पक्षश्रेष्ठी सुरुवातीपासून आग्रही होते. मागच्या आठ वर्षांत पक्षाला मिळणाऱया देणग्या आटल्याने निधीची चणचण जाणवत आहे. त्यात पक्षाचा जनाधारही घटला आहे. त्यामुळे प्रभावी लोकनेता म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविणे अधिक श्रेयस्कर असेल, असे नेतृत्वास वाटते. गेहलोत यांना संघटनात्मक व्यवस्थापनाचा अनुभव आहे. त्यांच्यासारख्या मुरलेल्या नेत्याची वर्णी लागल्यास अनेक आव्हाने पेलता येतील. त्यांच्यातील मुत्सद्दीपणाही कठीण काळात पक्षाला तारू शकतो, या भावनेतून त्यांच्याकडे श्रेष्ठींचा अधिक कल दिसून येतो. गेहलोत यांना मात्र राजस्थानची गादी सांभाळण्यात अधिक रस असल्याचे अधोरेखित होते. या सगळय़ा संभ्रम वाढविणाऱयाच बाबी ठरतात. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार, हे या क्षणी छातीठोकपणे सांगणे कठीण होय. 1998 पासून सोनिया गांधी या पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. कमकुवत झालेल्या काँग्रेसला पुन्हा सत्ताप्राप्ती झाली, ती त्यांच्याच काळात. परंतु, मोदी पर्वानंतर दिवसेंदिवस पक्ष रसातळालाच जात असून, गळती अजूनही थांबण्याची चिन्हे नाहीत. जी-23 मधीलही काही नेते बाहेर पडले आहेत. काही आगामी काळात बाहेर पडू शकतात किंवा पक्षात राहून महाभारतातील शल्याची भूमिका बजावू शकतील. तसा हा काळ काँग्रेससाठी अतिशय खडतरच आहे. कठीण काळात कुणीही कुणाचे नसते. त्यामुळे लोकांमध्येच जाऊन काँग्रेसला आपले अस्तित्व शोधावे लागेल. काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत चालणार असून, यात्रेत असलेले राहुल एक दिवसासाठी दिल्लीत जाणार आहेत. ‘भारत जोडो’मुळे किमान चर्चेत आलेल्या काँग्रेसला दिशा देण्याचे काम आता नव्या अध्यक्षांना करावे लागेल. त्याकरिता अध्यक्षपदाचा हा सस्पेन्स अगोदर संपावा लागणार आहे. एकतर अधिक काथ्याकूट न करता स्वतः रिंगणात उतरणे किंवा गांधीतर अध्यक्ष निवडीकरिता वाट मोकळी करून देणे, असे दोन पर्याय काँग्रेस नेतृत्वाकडे आहेत. त्यातला कोणता ते अवलंबतात, ते लवकरच कळेल. 2024 साठीची सज्जता दाखविण्यासाठी तरी त्यांना हे करावेच लागेल.
Previous Articleमहिंद्रा हॉलिडेचा समभाग वधारला
Next Article मान यांच्यावरील आरोपांमध्ये केंद्र लक्ष घालणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.