ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ‘हिंदुस्थानी’ असं त्यांनी पक्षाला नाव दिलं असून, पक्षाचा अजेंडाही सांगितला आहे.
आझाद म्हणाले, माझ्या पक्षाचं नाव अमूक आहे, झेंडा तमूक आहे, असं फर्मान मी दिल्लीत बसून सोडणार नाही. माझ्याकडे बरीच नावं आली होती. त्यामधील काही नावं उर्दु होती. काही संस्कृत होती. पण माझ्या पक्षाचं नाव ‘हिंदुस्थानी’ असेल. जे हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनांना समजेल आणि सामावून घेईल. हा पक्ष सर्वांचाच असेल. पक्षाचा झेंडाही काश्मीरमधील लोकच ठरवतील.
अधिक वाचा : दादा हा पहाटेसारखा ‘फ्लॉप शो’ नाही; ‘शोले’ आहे… श्रीकांत शिंदेंनी घातला अजितदादांच्या वर्मावर घाव
पक्षाच्या अजेंडय़ावर बोलताना ते म्हणाले, माझ्या विधानसभेत लेफ्टनंट गव्हर्नर नाही तर गर्व्हनर असेल. लोकांना त्यांच्या त्यांच्या जमिनी मिळाव्यात, तरुणांना रोजगार मिळावा, बिहारमधील कोणालाही जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी मिळू नये, तसेच काश्मीरी पंडितांचं काश्मीरी खोऱ्यात पुनर्वसन व्हावं, हा माझा अजेंडा आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी माझ्याकडे भांडार आहे. जम्मू-काश्मीरच्या एका-एका डोंगरात पर्यटन स्थळ निर्माण करुन रोजगाराची निर्मिती होऊ शकते. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला जे करणं शक्य होतं ते मी केलं. जे शक्य नव्हतं ते दिल्लीच्या माध्यमातून केलं. काश्मीरी पंडितांच्या हत्या थांबविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, असेही आझाद म्हणाले.