बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ
वार्ताहर/ किणये
रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सतराव्या मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम रविवारी मरगाई देवस्थान परिसर बेळगुंदी येथे उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा हेमा हदगल होत्या. निवृत्त सुभेदार धनंजय मोरे यांच्या हस्ते मुहूर्तमेढचे पूजन केले. नाना पाटील यांनी श्रीफळ वाढविले.
ग्रामपंचायत उपाध्यक्ष रेहमान तशिलदार, मुकुंद हिंडलगेकर, नामदेव गुरव, वाय. पी. नाईक आदींनी दीपप्रज्वलन केले. विविध मान्यवरांनी विविध देवदेवतांच्या फोटो प्रतिमेचे पूजन केले.
कवी, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी संमेलन
साहित्य अकादमीचे अध्यक्ष प्रकाश किणयेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रामीण भागातील नवोदित कवी, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच या भागात साहित्याचा जागर करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दि. 11 डिसेंबर रोजी 17 व्या बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्नांची गरज
कथा, कांदबऱ्या, भारुडे यातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन होते. ग्रंथ हेच आपले गुरू आहेत. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येक घरामध्ये ग्रंथ असायलाच पाहिजे, असे मनोगत प्रमुख वक्ते ज्येष्ठ कवी वाय. पी. नाईक यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी आई ही कविता सादर केली.
पुस्तके, साहित्यिकांचे विचार हे उच्च दर्जाचे असतात. हे विचार आपण आत्मसात केले पाहिजे असे मनोगत नानासाहेब यांनी व्यक्त केले. अभंग आणि ओव्यांच्या माध्यमातून एकमेकांची मने जोडण्याचे कार्य संत साहित्यिकांनी केले आहे, असे मनोगत मुकुंद हिंडलगेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी महादेव पाटील, रवळू गावडा, व्यंकट देसाई, दत्तू पाटील, महेश काकतीकर, बाळू शहापूरकर, सुमन नागेनट्टी, सुधा कमराळकर, कविता हुबळीकर, प्रदीप रायान्नाचे, प्रकाश हुबळीकर आदींसह नागरिक उपस्थित होते. कोवाडे यांनी आभार मानले.