किरण ठाकुर यांनी व्यक्त केली अपेक्षा : रौप्य महोत्सवी आविष्कार उत्सवाचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
मागचे शतक आपण बरेच काही शिकण्याचे होते तर हे शतक कर्तबगारी दाखविण्याचे आहे. महिलांनी सर्वच क्षेत्रात अशी कर्तबगारी दाखविली आहे. येणारा काळ पाहता बेभान होऊन काम करायला हवे. ‘आविष्कार’ संस्थेने महिलांच्या उद्यमशीलतेला वाव दिला आहे व सातत्य राखले आहे. आता ऑनलाईन मार्केटिंगसह नवीन तंत्रज्ञान त्यांनी अवलंब केले पाहिजे, अशी अपेक्षा ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.
‘आविष्कार’ संस्थेतर्फे रौप्य महोत्सवी आविष्कार उत्सव मराठा मंदिर येथे शुक्रवारपासून सुरू झाला आहे. या उत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर किरण ठाकुर बोलत होते. या सोहळय़ाला प्रमुख पाहुण्या म्हणून उगार येथील स्मिताताई शिरगावकर उपस्थित होत्या.
किरण ठाकुर म्हणाले, लोकमान्य सोसायटीची स्थापना केल्यानंतर महिलांसाठी एखादा उपक्रम सुरू करण्याची संकल्पना आपण मांडल्यानंतर ‘आविष्कार’च्या रुपाने ती उभी राहिली. याबद्दल संचालकांचे अभिनंदन केले. संस्थेच्या वाटचालीत कांचन परुळेकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्याप्रमाणेच झोकून देऊन काम करता यायला हवे, असे ते म्हणाले. आता विक्रीला मार्केटिंगची जोड द्या तसेच विविध उद्योगांचे प्रशिक्षण द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
कौशल्य विकासाची गरज!
सर्वच स्तरातील महिला एकत्र आल्या की संस्था बळकट होतात. ‘आविष्कार’ त्याचेच उदाहरण असून आता कौशल्य विकासाची गरज आहे. नाविन्याच्या शोधात रहा, कर्तृत्व आणि नेतृत्व यांची गुंफण करा, म्हणजे समाधानाचे क्षण येतात, असे स्मिता शिरगावकर यांनी सांगितले. तसेच परिस्थितीशी झगडणाऱया महिलांना प्रोत्साहन द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
किरण ठाकुर, हुंबरवाडी (अण्णा) व कांचन परुळेकर यांच्यामुळे ‘आविष्कार’ प्रगती करू शकली, असे अध्यक्षा सुलभा खानोलकर यांनी प्रारंभी नमूद करून काळानुरुप महिलांना प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगितले. सूत्रसंचालन सुनिता पाटणकर यांनी केले. याप्रसंगी सर्व संचालक उपस्थित होत्या.