दशरथ परब यांचे उद्गार : स्वातंत्र्यसैनिक गोविंद चिमुलकर यांचा सत्कार
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांवर पोर्तुगीजांकडून निष्ठूर अत्याचार करण्यात आले. मात्र त्यांनी आपल्या घरादाराची पर्वा न करता गोवा मुक्ती हे एकमेव ध्येय डोळय़ांसमोर ठेवल्याने आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. नवीन पिढीने आपला इतिहास व स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग कायम स्मरणात ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे उद्गार मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष तथा कवी दशरथ परब यांनी काढले.
बांदोडा येथील स्नेहमंदिरमध्ये क्रांतीदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्य सैनिक गोविंद प्रभू चिमुलकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जयवंत आडपईकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, स्नेहमंदिरचे पदाधिकारी अरविंद तेलंग, सुमन सामंत, अनुप मोपकर, प्रागतिक विचार मंचचे सुनील सावकार, हेमंत खांडेपारकर, विनोद नाईक, लक्ष्मण नाईक, माधुरी उसगांवकर आदी उपस्थित होते. गेली चाळीस वर्षे प्रागतिक विचार मंचही संस्था क्रांतीदिनी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार घडवून आणत आहे. त्यांचे हे कार्य स्तुत्य असल्याचे रमेश वंसकर म्हणाले. सुमन सामंत म्हणाल्या मुक्तीपूर्व इतिहास कटू होता. मात्र गोव्याने आज जी प्रगती केली आहे. त्यात स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान मोठे आहे. प्रागतिक विचार मंच व स्नेहमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सैनिक गोविंद प्रभू चिमुलकर यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना गोविंद चिमुलकर म्हणाले, आज आपण वयाची नव्वदी पार केली आहे. आपले तारुण्य मुक्तीलढय़ात व्यतित झाले. साडेसात महिन्यांचा तुरुंगवास आपल्या वाटय़ाला आला. राम मनोहर लोहियांना आपण दैवत मानतो. पोर्तुगीजांकडून त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांवर होणारे अत्याचार आठवून आजही अंगावर रोमांच उठतात.
जयवंत आडपईकर यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रसंचालन तर लक्ष्मण नाईक यांनी आभार मानले.