नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मंगळवार संध्याकाळ ते बुधवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णसंख्येने 2 हजाराची संख्या पार केली आहे. पाच महिन्यांनंतर प्रथमच एका दिवसात 2 हजार हून अधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आणि केरळ ही दोन राज्ये नव्या रुग्णसंख्येत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येप्रमाणेच उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. सध्या देशभरात 11,903 रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या देशातील प्रतिदिन पॉझिटिव्हीटी दर 1.51 टक्के आहे तर साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 1.53 टक्के आहे. बुधवारच्या दिवसात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 7 इतकी असून त्यांच्यात 3 केरळचे, 3 महाराष्ट्राचे आणि कर्नाटकातील एकाचा समावेश आहे.
कोरोना रुग्णांची संख्या सर्व राज्यांमध्ये वाढत असली तरी प्रामुख्याने केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि दिल्लीत अधिक वेगाने संख्या वाढत आहे. देशातील एकंदर 24 जिल्हय़ांमध्ये आता पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांवर पोहचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.