2008 मध्ये होते 900 हत्ती ः आता केवळ 448
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये ‘बंदी’ (माणसांकडून पाळले जाणारे) हत्तींची संख्या सातत्याने कमी होत आहे. 2008 मध्ये राज्यात सुमारे 900 बंदी हत्ती होते, परंतु आता या संख्येत 50 टक्क्यांची घट झाली आहे. आता केवळ 448 हत्तीच शिल्लक राहिले आहेत. मागील 5 वर्षांमध्ये 115 बंदी हत्तींचा मृत्यू झाला आहे.
मानवी सान्निध्यात राहणाऱया हत्तींच्या विरोधातील क्रूरता वाढत असल्याचे हेरिटेज ऍनिमल टास्क फोर्सचे सचिव वी.के. वेंकटचलम यांनी म्हटले आहे. राज्याच्या सणांमध्ये परेडसाठी बाहेरून अधिक प्रमाणात हत्ती आणण्याच्या नियमांना शिथिल करण्याची मागणी केरळ एलिफेंट ओनर्स फेडरशनने केली आहे. या मागणीसंबंधी अनेक खासदारांची भेट घेत आहोत असे फेडरेशनचे महासचिव पी. शशिकुमार यांनी सांगितले आहे. तर वेंकटचलम यांनी बाहेरून हत्ती आणण्याच्या योजनेला विरोध दर्शविला आहे. बाहेरून येणाऱया हत्तींना क्रूर वागणूक दिली जाणार असल्याचे त्यांचे मानणे आहे.
केरळमध्ये दरवर्षी सरासरी 25 बंदी हत्तींचा मृत्यू होतो. मालकांकडून मिळणारी क्रूर वागणूक या हत्तींच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण असल्याचे केरळ वन विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.