यावर्षी केवळ 4 हजार 970 मूर्तींचे जलकुंडात विसर्जन, 15 टन निर्माल्य जमा
वार्ताहर/ कराड
गणेशोत्सव काळातील कृष्णा-कोयना नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी कराड नगरपालिका, एन्व्हायरो प्रेण्डस् नेचर क्लब व पर्यावरण प्रेमींनी सुमारे 17 वर्षापूर्वी पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाची चळवळ सुरू केली. या उपक्रमाला कराडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोरोनापूर्वी 2019 साली एकूण साडे सहा हजार मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले होते. यंदा मात्र 4 हजार 970 मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले आहे.
स्वच्छ भारत, माझी वसुंधर अभियानात राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या कराड शहरात 2005 मध्ये पर्यावरण पूरक मूर्ती विसर्जनाची चळवळ सुरू केली. पहिल्या वर्षी केवळ 25 मूर्तींचे पर्यवरण पूरक विसर्जन करण्यात आले होते. यानंतर मात्र पालिका व पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात जणजागरण मोहीम राबवण्यात आली. घरोघरी व शाळेत जाऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्व पटवून देण्यात आले. परिणामी पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाकडे नागरिकांचा कल वाढला. नागरिकांना सहजतेने विसर्जन करता यावे, यासाठी पालिका प्रतिवर्षी शहरात ठिकठिकाणी जलकुंड व निर्माल्य कलश ठेवते.
कोरोनापासून पालिकेच्या माध्यमातून मूर्ती संकलन मोहीम राबवण्यात येत होती. यासाठी खास मूर्ती संकलन वाहने ठेवली होती. पालिका व पोलीस प्रशासनानेच बहुतांश मूर्तींचे विसर्जन केले होते. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाची चळवळ कराडकारांत चांगल्याप्रकारे रूजल्याने कोरोनाच्या आधी 2019 च्या गणेशोत्सवात शहरात एकूण 6 हजार 500 मूर्तींचे पर्यावरण पूरक विसर्जन करण्यात आले होते. यावर्षी पालिकेने शहरात 21 जलकुंड उभारले होते. निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. कृष्णा घाटावर दीड दिवस, पाच दिवस व दहा दिवसांच्या मूर्ती विसर्जनासाठी येणाऱया नागरिकांना जलकुंडात मूर्ती विसर्जनाचे आवाहन करण्यात येत होते. यावर्षी मात्र एकूण 4 हजार 970 मूर्तींचे पर्यावरण पुरक विसर्जन करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी कराडकर नागरिकांनी पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाकडे पाठ फिरवल्याचे पाहावयास मिळाले.
पर्यावरणाचा विचार ठाम राहावा – प्रा. काशिद
कृष्णा-कोयना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका व एन्व्हायरो क्लब 17 वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. जनजागृतीही केली आहे. नागरिकांतील पर्यावरणाचा विचार ठाम राहणे गरजेचे आहे. आमच्या प्रयत्नातील सातत्य कायम ठेवणार असल्याचे एन्व्हायरो क्लबचे अध्यक्ष प्रा. जलिंदर काशिद यांनी सांगितले.