2 महिन्यात 54.77 लाख जण मोबाईलपासून दूर ः ट्रायच्या माहितीमधून आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या दोन महिन्यांत 54.77 लाख लोक मोबाईल फोनपासून दुरावले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या मते, ऑक्टोबर 2022 मध्ये देशभरातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या 114.36 कोटी झाली आहे. तर ऑगस्ट महिन्यात अंदाजे 114.91 कोटी मोबाइल वापरकर्ते होते. सप्टेंबर महिन्यात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 36.64 लाखांनी घटून 114.54 कोटी झाली आहे. त्याचवेळी, ऑक्टोबर महिन्यात 18.13 लाख मोबाइल वापरकर्ते कमी झाले असल्याचेही सांगितले आहे.
रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे आणि पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑक्टोबरमध्ये जिओने 14.14 लाख नवीन ग्राहक जोडले. यामुळे जिओ नेटवर्क वापरकर्त्यांची संख्या 42.13 कोटी झाली आहे. त्याच वेळी, ऑक्टोबरमध्ये 8.5 लाख नवीन ग्राहक भारती एअरटेलमध्ये सामील झाले आहेत. एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 36.50 कोटी झाली आहे.
व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक
व्होडाफोन आयडियाचे यूजर्स सातत्याने कमी होत आहेत. व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या 35.09 लाख वापरकर्त्यांनी ऑक्टोबरमध्ये नेटवर्क सोडले आहे. यासह, कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 24.56 कोटी झाली आहे. त्याच वेळी, बीएसएनएलचे 5.92 लाख वापरकर्ते कमी झाले आहेत. त्यामुळे त्याच्या वापरकर्त्यांची संख्या 10.86 लाखांवर आली आहे.
देशात 20,980 5 जी बेस स्टेशन्स बसवण्यात आला
5जी सेवेबद्दल सांगताना ट्रायने सांगितले आहे की, 26 नोव्हेंबरपर्यंत देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20,980 इतके 5-जी बेस स्टेशन्स बसवण्यात आली आहेत. दळणवळण राज्यमंत्री देवू सिंह चौहान यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, सुमारे देशात दर आठवडय़ाला 2500 नवीन 5जी टॉवर जोडले जात आहेत.