नेपाळ अन् बांगलादेशच्या सीमेवर घुसखोरीचे प्रकार ः बीएसएफची कार्यकक्षा वाढविण्याची शिफारस
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तरप्रदेश आणि आसाममध्ये आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या जिल्हय़ांमध्ये मागील केवळ 10 वर्षांमध्ये डेमोग्राफिक (लोकसंख्येच्या स्वरुपात) बदल झाला आहे. ग्राम पंचायतींच्या नव्या नोंदींच्या आधारावर उत्तरप्रदेश आणि आसाम पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला वेगवेगळे अहवाल पाठविले आहेत. दोन्ही अहवालांमध्ये सीमेला लागून असेल्या जिल्हय़ांमध्ये मुस्लिम लोकसंख्या 2011 च्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढली असल्याचे नमूद आहे. तर पूर्ण देशात हा बदल 10 ते 15 टक्क्यांदरम्यान आहे.
सुरक्षा यंत्रणा आणि राज्यांच्या पोलिसांनी या बदलाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील मानले आहे. याचमुळे दोन्ही राज्यांनी बीएसएफचे अधिकारक्षेत्र 50 किलोमीटरवरून वाढत 100 किलोमीटर करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच बीएसएफला सीमेपासून 100 किलोमीटर अंतरापर्यंत चौकशी तसेच झडती घेण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.
एवढा मोठा डेमोग्राफिक बदल केवळ लोकसंख्या वाढीचा मुद्दा नाही. भारतात घुसखोरीचे हे नवे स्वरुप असू शकते. याचमुळे राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेत आतापासूनच कठोर पावले उचलावी लागतील. याचमुळे उत्तरप्रदेश आणि आसाममधील सुरक्षा यंत्रणांनी बीएसएफची कार्यकक्षा वाढविण्याची शिफारस केली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
गुजरात वगळता अन्य सीमावर्ती राज्ये पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तरप्रदेश आणि ईशान्येतील राज्यांमध्ये पूर्वी बीएसएफचे अधिकारक्षेत्र 15 किलोमीटरच्या कक्षेपुरती मर्यादित होते. ऑक्टोबर 2021 मध्ये ही कक्षा वाढवून 50 किलोमीटर करण्यात आली होती. काही राज्यांनी यावर आक्षेपही घेतला होता. आता आसाम आणि उत्तरप्रदेशने ही कक्षा 100 किलोमीटर करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याकरता तयारीही सुरू केल्याचे समजते.
नेपाळच्या सीमेला लागून असलेले उत्तरप्रदेशातील 5 जिल्हे पीलीभीत, खीरी, महाराजगंज, बलरामपूर आणि बहराइचमध्ये मुस्लिमांची संख्या 2011 च्या राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी अधिक प्रमाणात वाढली आहे. शासकीय नोंदीत नव्याने नोंद झालेली नावे किती वैध आणि किती अवैध आहेत याचा शोध लावणे हे राज्यांच्या पोलिसांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. विदेशातून येत येथे लोक स्थायिक झाल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे.
उत्तरप्रदेशच्या 5 सीमावर्ती जिल्हय़ांमध्ये 1 हजाराहून अधिक गावे आहेत. यातील 116 गावांमध्ये मुस्लिमांची संख्या आता 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. एकूण 30 गावांमध्ये मुस्लिमांची संख्या 30 ते 50 टक्क्यांदरम्यान आहे. उत्तरप्रदेशच्या सीमावर्ती जिल्हय़ांमध्ये मशिदी अन् मदरशांची संख्या एप्रिल 2018 पासून मार्च 2022 पर्यंत 25 टक्क्यांनी वाढली आहे. सीमावर्ती भागांमध्ये दीर्घ काळापासून घुसखोरी सुरू आहे. बांगलादेशातून घुसखोरी करत विदेशी नागरिक येथे पोहोचल्याचा गुप्तचर यंत्रणांचा अहवाल आहे.
बांगलादेशला लागून असलेले आसाममधील जिल्हे धुवरी, करीमगंज दक्षिण सलमारा आणि काछरमध्ये मुस्लिमांची संख्या 32 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. 2011 झालेल्या जनगणनेनुसार राष्ट्रीय सरासरीच्या अनुमानानुसार लोकसंख्येतील वाढ 12.5 टक्के तर राज्यस्तरीय अनुमानानुसार 13.5 टक्के होणे अपेक्षित होते.