ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा करण्यात आली. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही पूजा पार पडली. यावेळी शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, व्यावसायिक, उद्योजक यांच्यासह समाजातील सर्व घटकांना सुख समृध्दी लाभू दे, राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे, कोरोनाचे संकट कायम स्वरुपी दूर होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी विठूरायाला घातले.
महापूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, आजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे. पांडुरंगाची कृपा, आई वडीलांची पुण्याई यामुळेच आज महाराष्ट्रारातील बारा कोटी जनतेच्या वतीने मला पूजा करण्याची संधी मिळाली. लाखो वारकरी दरवर्षी पायी पंढरीची वारी करत असतात. कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा दहा लाखाहून अधिक वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. उशीरा का होईना राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. बळीराजा पावसामुळे सुखावतोय. तथापी यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, यासाठी राज्य सरकार कटिबद्द राहील.
बीडच्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987 पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत.
विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते.