कागदपत्रे गहाळ होण्याची भीती : मनपा अधिकारी लक्ष देणार का?
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेची नवीन इमारत उभारणी केल्यानंतर जुन्या इमारतीतील सर्व साहित्य हलविण्यात आले. मात्र काही कागदपत्रे एका गोडावूनमध्ये ठेवण्यात आली आहेत. त्या गोडावूनचा दरवाजा खुलाच ठेवण्यात आला असून यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे या इमारतीमध्ये तहसीलदार कार्यालय थाटण्यात आले आहे. मात्र या इमारतीकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे.
महानगरपालिकेचे कामकाज या जुन्या इमारतीमध्ये बरीच वर्षे चालले होते. त्यावेळी इमारतीच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात येत होते. इमारतीची डागडुजीही वारंवार करण्यात येत होती. मात्र आता नवीन महानगरपालिकेची इमारत उभारण्यात आली. त्यानंतर ही इमारत तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सध्या या इमारतीमध्ये विविध विभाग काम करत आहे. मात्र या इमारतीला गळतीही लागली आहे.
महानगरपालिकेने एका खोलीमध्ये जुने पेपर ठेवले आहेत. त्याठिकाणी संपूर्ण धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचबरोबर या खोलीचा दरवाजा खुलाच आहे. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे असतील तर ती गहाळ होण्याची शक्यता आहे. अजूनही जुन्या कागदपत्रांची गरज अनेकांना असते. त्यावेळी त्याची शोधाशोध केली जाते. तसेच तेथील कागदपत्रे घेऊन गैरप्रकार करण्याचीही शक्यता आहे. तेव्हा याकडे महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.