पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत विधान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीनंतरही सध्याचे विरोधी पक्ष लोकसभेत विरोधी बाकांवरच आढळतील, अशी खोचक टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते मंगळवारी येथे आयोजित भारतीय जनता पक्ष संसदीय मंडळाच्या बैठकीत भाषण करीत होते. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीसंबंधी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
विरोधी पक्ष सध्या ज्या प्रकारे वागत आहेत, त्यावरुन असे दिसून येते, की त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरही विरोधी पक्षातच राहण्याचा निर्धार केला आहे. त्यांची वर्तणूक पाहून देशातील समस्त मतदारांनीही त्यांना पुन्हा विरोधी पक्षातच ठेवायचे, असा निर्धार केला आहे. इतकेच नव्हे, तर सध्या त्यांची जी स्थिती आहे, त्याहीपेक्षा ते मागे ढकलले जाण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी लोकशाहीच्या मर्यादेत राहून आणि स्वत:चा आवाज न तापवता, विरोधी पक्षांना उघडे पाडले पाहिजे. कारण विरोधी पक्षांनी ताळतंत्र सोडला आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.
कामकाजात अडथळा नैराश्यातून
सध्या विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजात अडथळे आणून ते होऊ न देण्याचा चंगच बांधलेला दिसतो. त्यांची ही कृती नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा जो दारुण पराभव झाला, त्यापोटी आलेल्या नैराश्यातून होत आहे. ते मनातून धास्तावले आहेत. संसदेच्या संरक्षणात झालेल्या कुचराईचे त्यांनी चालविलेले राजकारण त्यांच्या नकारात्मक मानसिकतेचे प्रतीक आहे, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी पुढे त्यांच्या भाषणात केला.
जे झाले ते लोकशाहीला मारक
काही दिवसांपूर्वी लोकसभेत जो प्रकार घडला तो लोकशाहीला मारक होता. या प्रकाराची सर्वांनी, पक्षभेद विसरुन निंदा करावयास हवी होती. तथापि, विरोधी पक्ष या प्रकाराला समर्थन देत असून त्याचे भांडवल करीत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यानंतर विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज ठप्प केले असून, त्याद्वारे ते आपले लोकशाहीप्रेम नव्हे, तर निवडणूक हारण्याची धास्ती व्यक्त करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या संसद सदस्यांनी मात्र, विरोधी पक्षांनी काहीही केले तरी संसदेच्या कामकाजात गांभीर्याने भाग घेऊन जनतेकरिता असणारे त्यांचे कर्तव्य केले पाहिजे. संसदेत काही महत्वाची विधेयके सादर करण्यात आली आहेत. ती संमत होणे देशाच्या हितासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ती संमत करण्यात भाजपच्या संसदसदस्यांनी त्यांची भूमिका साकारावयास हवी. त्यांनी विरोधी पक्षांशी वादावादी करण्याच्या फंदात पडू नये, असे मौलिक आवाहन त्यांनी केले.
संसदीय मंडळाची बैठक कशासाठी
संसदेत गेल्या आठवड्यात दोन युवकांनी प्रवेश करुन गोंधळ घातला होता. तसेच धुराच्या नळकांड्या उघडल्या होत्या. त्यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न समोर आला होता. त्या घटनेनंतर विरोधी पक्षांनी एक दिवसही संसदेचे कामकाज सुरळीत चालू दिलेले नाही. प्रचंड घोषणाबाजी, गदारोळ आणि अपशब्दांचा उपयोग करण्यात आला. परिणामी, संसदेतून साधारणत: दीडशे विरोधी खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेतील प्रकाराचा निषेध करण्याऐवजी विरोधी पक्ष या घटनेचे निमित्त करुन संसदेपासून पळ काढत आहेत, असा आरोप सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.
पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
ड भाजप संसदीय मंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींकडून विरोधी पक्षांवर टीका
ड विरोधी पक्षांना संसदीय कामकाजात स्वारस्य नाही, हारण्यासाठी ते सज्ज
ड भाजप सदस्यांनी विरोधी पक्षांची नकारात्मकता लोकांमध्ये उघडी पाडावी
ड आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न व्हावेत