पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यावरुन वाद-विवाद : महाराष्ट्र पंचायत निवडणुकीबाबतचा निकाल सर्व राज्यांना लागू : गुदिन्हो
प्रतिनिधी /पणजी
पंचायत निवडणूक जर पुढे ढकलायची असेल तर राज्य सरकारने न्यायालयात जाऊन तशी मान्यता मिळवावी असा सल्ला राज्य निवडणूक आयोगाने सरकारला दिला असून तशा आशयाचे पत्रही पाठवले आहे. दरम्यान, तो सल्ला पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी फेटाळून लावला असून न्यायालयात जाण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग व सरकार अर्थात मंत्री यांच्यात वाद-विवाद सुरु झाल्याचे समोर आले आहे.
गुदिन्हो म्हणतात की, महाराष्ट्रातील पंचायत निवडणुकीबाबत जो निकाल न्यायालयाने दिला आहे तो सर्व राज्यांना लागू होतो. त्यामुळे न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही असा दावाही त्यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाचा निकाल नीट वाचावा, अर्थ समजून घ्यावा असा सल्लाही गुदिन्हो यांनी दिला आहे. आयोगाने तसे केले नसल्याचे मतही गुदिन्हो यांनी प्रकट केले आहे.
पावसात निवडणूक नको, उगाच आरोप होतील
पाऊस तोंडावर असताना पंचायत निवडणूक कशी घेणार? असा प्रतिसवाल गुदिन्हो यांनी केला असून पावसात निवडणूक घेतली तर मुद्दाम घेतली असा अर्थ अनेकजण काढतील. मतदान कमी व्हावे म्हणून घेतली असा ठपकाही ठेवला जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली. पंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर 6 महिन्यात केव्हाही निवडणूक घ्यावी असे स्पष्ट निर्देश असताना त्याची घाई कशाला? असेही गुदिन्हो म्हणाले. कार्यकाळ 19 जूनला संपल्यानंतर 6 महिन्यांचा कालावधी हातात आहे तेव्हा त्या कालावधीत केव्हाही निवडणूक घेता येणे शक्य आहे. म्हणून न्यायालयात जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे स्पष्टीकरण गुदिन्हो यांनी दिले आहे.