विष पोटात गेल्याने जीव जातो, ही बाब सर्वश्रुत आहे. तथापि, विषामुळेच जीव वाचल्याची घटना मध्यप्रदेशातील गंगाराम रुग्णालयात घडली आहे. या रुग्णालयात एक महिन्यापूर्वी एका सात वषीय बालकाला बेशुद्धावस्थेत उपचारांसाठी आणण्यात आले होते. त्याला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. हा बालक आपल्या भावासह शाळेतून येत असताना दोघांनीही वाटेत रत्तीच्या झाडाच्या बिया खाल्ल्या होत्या. या बिया विषारी असतात, हे त्यांना माहिती नव्हते. काही वेळानंतर विषाचा परिणाम दिसू लागला आणि दोघेही बेशुद्ध पडले. धाकटय़ा भावाचा जागेवरच मृत्यू झाला तर मोठय़ा सात वर्षांच्या भावाला गंगाराम रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी त्याची स्थिती गंभीर होती. विषामुळे त्याच्या मेंदूला सूज आली होती. तसेच त्याला रक्ताच्या उलटय़ाही होत होत्या. या विषाला कोणतेही प्रतिविष नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे नेमका कोणता उपाय करावा, याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. तातडीचा उपाय म्हणून या मुलाला रक्तदाब कमी करण्याची औषधे देण्यात आली. तसेच फिट येऊ नये म्हणूनही उपाय करण्यात आले. तरीही तो बरा होत नव्हता. अखेरीस ज्या बियांमुळे त्याची ही स्थिती झाली होती त्याच बिया औषध म्हणून देण्यात आल्या आणि झपाटय़ाने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. अशा प्रकारे विषाला तेच विष मारक ठरले. डॉक्टरांसाठीही हा नवा प्रयोग होता. अगदी शेवटचा उपाय म्हणून तो धोका पत्करून करण्यात आला होता. पण तो यशस्वी ठरल्याने या बालकाचे प्राण वाचले आहेत. तसेच त्याच्या आईवडिलांनाही एक मुलगा जिवंत परत मिळाला आहे.
Previous Articleट्रकमध्ये तेल भरता भरता उघडले नशीब
Next Article उपासना..1
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.