मयेवासीयांची मागणी. नवरात्रोत्सव बंद करण्याचा पुन्हा आदेश जारी. वातावरण तंग. श्री देवी केळबाई मंदिरावरच अन्याय नको.
डिचोली/प्रतिनिधी
केळबाईवाडा मये येथील श्री देवी केळबाई मंदिरात सुरू करण्यात आलेला नवरात्रोत्सव बंद करण्याचा आदेश डिचोलीचे मामलेदार तथा देवस्थान प्रशासक राजाराम परब यांनी काल बुध. दि. 28 सप्टें. रोजी पुन्हा जारी केल्याने मयेतील वातावरण पुन्हा तंग झाले. या आदेशानंतर रात्री मंदिर परिसरात शेकडोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावत या आदेशाला विरोध दर्शवत केवळ याच मंदिरावर अन्याय न करता सदर अन्यायकारक आदेश मामलेदारांनी तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली.
मये गावातील देवस्थानच्या उत्सवांमधील अधिकारावरून सुरू असलेला वाद सर्वश्रुत आहे. त्यातच आता हे नवरात्रोत्सवाचे नवीन प्रकरण सुरू झाले आहे. या प्रकरणी यापूर्वी अशाच प्रकारे मामलेदार कार्यालयात नवरात्रोत्सवाबाबत सुनावणी झाली होती. त्यात 2019 साली मामलेदारांनी एक आदेश जारी करून नाईक कुटुंबाला नवरात्रोत्सव साजरा करण्याची सुचना केली होती. त्यानुसार नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे.
याही वषी हाच मुद्दा उपस्थित झाला होता. देवस्थान समितीतर्फे मामलेदारांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्यावर मामलेदारांनी डिचोली पोलीस निरीक्षक, तलाठी व इतरंच्या समक्ष एक बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर घटस्थापनेदिनी मोठय़ा पोलीस बंदोबस्तात मामलेदारांच्या उपस्थितीत पुजा करण्यात आली. त्यानंतर लगेच सदर नवरात्रोत्सवातील पुढील सर्व कार्यक्रम बंद ठेवण्याचा आदेश मामलेदारांनी जारी केला. याची नोटीस नाईक समाजातील सदस्यांना देण्यात आली होती. त्यादिवशी मयेतील मोठय़ा संख्येने मामलेदार कार्यालयाकडे उपस्थित लोकांनी मामलेदारांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. व या बाबत चर्चा झालीच नाही. त्यामुळे मंदिरातील कार्यक्रम चालूच होते. तर काल बुध. दि. 28 रोजी आणखीन एक आदेश मामलेदारांनी काढत देवी केळबाईच्या मंदिरातील कार्यक्रम बंद ठेवण्याचे म्हटले आहे. त्यामुळे मयेत वातावरण तणावाचे झाले आहे.
यासंदर्भात काल बुधवारीच रात्री मंदिरच्या मंडपात बैठक झाली. या बैठकीस मयेचे सरपंच दिलीप शेट, पंचसदस्य सीमा आरोंदेकर, तुळशीदास चोडणकर, विद्यानंद कारबोटकर व इतरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी.आपापले विचार मांडले. व या आदेशाला विरोध केला. तसेच मयेतील देवस्थाने हि पंचायतन देवस्थान असून केवळ केळबाई देवीच्या मंदिरातील उत्सवावर अन्याय का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. बंदच करायचे असल्यास सर्वच गावातील उत्सव बंद करा, तथापी या मंदिरातील उत्सवावर वक्रदृष्टी नको. मामलेदारांनी आपला नवरात्रोत्सव बंद करण्याचा आदेश तत्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मगणी यावेळी नागरिकांनी तसेच नवरात्रोत्सव उत्सव समिती, मंदिर सभामंडप बांधकाम समिती व गणेश विसर्जन समितीने मागणी केली आहे.