राष्ट्रवादीचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड करत शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.डबल इंजिनला एक डबा जोडल्याचे जरी बोलले जात असले तरी राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने राज्याचे राजकारण पुन्हा एकदा अस्थिरतेच्या दिशेनेच सुरू झाले आहे. शिवसेनेची शकले झाल्यानंतर शिंदे गट विरूध्द ठाकरे गट यांच्यातील न्यायालयीन प्रक्रिया नुकतीच कुठे पूर्ण झाल्यानंतर आता राष्ट्रवादीतून तशीच न्यायालयीन प्रक्रिया, विधिमंडळ पक्ष, प्रतोद, विधिमंडळ गटनेता निवड या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरच पुतण्या अजित पवारने दावा केल्यानंतर शरद पवारांनी थेट पक्ष आणि चिन्ह गेले तरी शरद पवार हाच राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा असल्याचे सांगत पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असला तरी अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा नसल्याने किती आमदार अजित पवारांसोबत आहेत याबाबत संभ्रम कायम आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाईला सुरूवात केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाने देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून खासदार सुनिल तटकरे यांची तर राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेते पदी अजित पवार यांची निवड केली आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर जो राजकीय पक्षावर दावा करण्यासाठी विधिमंडळ जे दावे-प्रतिदावे केले जात होते तसेच आता केले जात आहे. फरक इतकाच आहे की त्यावेळी शिवसेनेतील बंड हे एका नेत्याच्या नेतृत्वाखाली होते तर राष्ट्रवादीतील बंड हे काका पुतण्यातील आहे. अजित पवारांनी यापूर्वीही भाजपसोबत पहाटेचा शपथविधी केला होता, काकांनी पुतण्याचे बंड काही तासात मोडीत काढल्याने अजित पवारांना या फसलेल्या बंडाचे शल्य होते. हे बंड फसल्यानंतर शरद पवारांनी महायुतीत जात भाजपला दूर ठेवले. महायुतीचे सरकार गेल्यानंतर राष्ट्रवादीत काही संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये अजित पवारांना डावलण्यात आल्याने अजित पवारांनी विधानसभा विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा घ्या असे बोलताना आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या बंडाकडे शिवसेनेच्या बंडाच्या तुलनेत गांभीर्याने पाहिले जात नाही. शिवसेनेच्या बंडाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात सत्तांतर झाले होते तर कालच्या बंडाने डबल इंजिन सरकारला अजून एक डबा जोडला गेल्याने लोकांनी या बंडाकडे एका राजकीय घराण्यातील वाद म्हणूनच सध्या तरी पाहत आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर ज्याप्रमाणे शरद पवार यांनी सक्रिय होत उध्दव ठाकरेंच्या पाठिशी उभे राहिले होते त्याप्रमाणे या बंडात मात्र पवार आक्रमक झाल्याचे दिसत नाहीत, त्यामुळे या बंडाबाबत आजही संभ्रम कायम आहे.
शरद पवार राष्ट्रवादीत झालेल्या राजकीय भूकंपानंतर सोमवारी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर जात पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला लागले. शरद पवारांचे वैशिष्ट्या म्हणजे ते काही नवं करायचे असेल किंवा संघर्षाचा काळ असेल तर त्या विरोधात लढण्यासाठी साताऱ्यातून सुरूवात करतात. त्यांच्या अनेक निवडणूकांचा नारळ ते त्यांच्या नांदवळ या मुळ गावातून करत आले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्या मागे सर्वात मोठी ताकद सातारा जिह्याने उभी केली होती. तर दोन वर्षापूर्वी सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत शरद पवार पावसात भिजले आणि उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. शरद पवारांची पावसातील सभा ही देशभर गाजली. या सभेनंतर अनेक नेते पावसात भिजू लागले. शरद पवारांचे एक वैशिष्ट्या आहे जे पक्ष सोडून जातात त्यांना पवार रोखत नाहीत मात्र योग्यवेळी टप्प्यात आल्यावर त्यांनी अनेकांचा कार्यक्रम केला. 2019 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अनेक वर्ष मंत्री असलेले जयदत्त क्षिरसागर, मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड हे पक्ष सोडून गेले. मात्र पवारांनी त्यांच्या मतदार संघात जात एकाच सभेत तेथील वातावरण फिरवले. दोन्ही ठिकाणी तरूण नेत्यांना संधी दिली आणि या दोन्ही नेत्यांचा पराभव झाला, मात्र आता पवारांना आव्हान हे दुसऱ्या पक्षाचे किंवा नेत्याचे नसून स्वत:च्याच पुतण्याचेच आणि पुतण्याने दावा केलेल्या स्वत:च्याच पक्षाचे असल्याने आत्तापर्यंतचे अनेक बंड मोडून काढणारे अनेक बंडोबांना थंडोबा करणारे, अनेकांना कात्रजचा घाट दाखवणाऱ्या पवारांना आपल्या खेळी खेळण्यात मर्यादा येणार आहेत. त्यातच अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यामागे देशातील महाशक्ती आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवर असलेले भ्रष्ट्राचाराचे आरोप बघता राष्ट्रवादीच्या लढाईत अजित पवार यांचे पारडे जड असणार आहे. त्यामुळे राजकीय उलथापालथ करण्यात माहिर असलेल्या शरद पवारांचा या बंडात करिष्मा चालणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पवारांच्या एन्ट्रीने शिंदे गटात अस्वस्थता
फडणवीस-शिंदे सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसत आहे. शिवसेना सोडताना ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप केले ज्या अजित पवारांवर निधी देताना अन्याय केल्याची भावना या आमदारांनी बोलून दाखविली. त्याच आमदारांच्या नशिबी पुन्हा अजित पवार हेच अर्थमंत्री असणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. रविवारच्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबतच शिंदे गटातील 4 आणि भाजपच्या 5 नवीन मंत्र्यांना विस्तारात स्थान दिले जाणार होते, मात्र ऐनवेळी केवळ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा शपथविधी उरकण्यात आल्याचे समजते. शिंदे गटातील 13 आमदार असे आहेत ज्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा पराभव करत विजय मिळवला आहे. आता शिंदे गटातील या 13 आमदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला असून, जर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांबाबत अपात्रतेचा निर्णय घेतला तर राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर अटळ आहे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची पूजा केल्यानंतर पाचच दिवसात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याने मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाचा प्रसाद मिळणार की पांडुरंगांच्या भक्तांना दुसरा मुख्यमंत्री हे लवकरच कळेल.
प्रवीण काळे