गोंयकार संघटनेची मागणी, 13990 झाडे कापावी लागणार असल्याचा दावा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटणार
प्रतिनिधी /काणकोण
बेंदुर्डे ते काणकोणपर्यंतच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रश्न हातात घेऊन प्रत्यक्ष सोपस्कारांना सुरुवात करण्यात आल्याबद्दल सभापती रमेश तवडकर यांचे अभिनंदन करतानाच करमल घाट ही काणकोणची ओळख असल्याने पर्यावरणाचा नाश न करता या ठिकाणचा रस्ता व्हायला हवा ही मागणी काणकोणच्या गोंयकार या बिगरसरकारी संघटनेने आणि करमल घाट बचाव समितीने परत एकदा उचलून धरली आहे. गरज पडल्यास हरित लवादासमोर हे प्रकरण नेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
राजबाग, तारीर येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेला गोंयकार संघटनेचे अध्यक्ष जॅक फर्नांडिस, विकास भगत आणि संदेश तेलेकर उपस्थित होते. करमल घाटावरील रस्ता तयार करायला गोंयकार संघटना विरोध करत आहे अशा प्रकारे या संघटनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे. या संघटनेचा रस्ता रूंदीकरणाला अजिबात विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली या ठिकाणी जी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार आहे त्याला या संघटनेचा त्याचप्रमाणे करमल घाट बचाव समितीचा आक्षेप आहे, असे विकास भगत यांनी सांगितले.
2017 साली गोंयकार संघटनेच्या वनखाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठांबरोबर दोनदा बैठका झाल्या. काणकोणचे विद्यमान आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांच्यासह वनखाते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, उपजिल्हाधिकाऱयांबरोबर बैठका झालेल्या आहेत. एकूण 14.50 किलोमीटर अंतरापैकी 7 किलोमीटरांचा परिसर करमल घाटात येत असून सरकारने जो प्रस्ताव मांडलेला आहे त्यासाठी 13990 इतकी झाडे कापावी लागणार आहेत. काणकोणच्या भवितव्याच्या दृष्टीने, पुढील पिढीच्या दृष्टीने आणि पर्यावरणाचा विचार केल्यास ही धोक्याची बाब आहे. भविष्यकाळात याचे परिणाम काणकोणवासियांना भोगावे लागतील, असा दावा यावेळी भगत यांनी अनेक उदाहरणांसहित केला.
केंद्रीय मंत्री गडकरींना अंधारात ठेवल्याचा संशय
झाडे न तोडता आवश्यक त्या ठिकाणी बोगदे, उड्डाणपूल किंवा स्टिल्ट पूल पद्धत वापरणे शक्य आहे. मात्र त्यासंदर्भात अधिक खर्च येईल वा उशीर होईल अशी कारणे पुढे केली जातात. यासंबंधी केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना अंधारात ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करून गोंयकार संघटनेचे शिष्टमंडळ दिल्ली किंवा नाशिक येथे जाऊन नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहे, असे जॅक फर्नांडिस यांनी सांगितले.
सागरमाला योजनेखाली आतापर्यंत बेंगलोर येथे 64 बैठका झालेल्या आहेत. मात्र त्या बैठकांत करमल घाट रस्त्याच्या कामासाठी ज्या प्रकारे झाडे तोडावी लागणार आहेत त्यावर चर्चा झालेली नसावी, असा संशय संदेश तेलेकर यांनी व्यक्त केला. नुकतीच दक्षिण गोव्याचे वनाधिकारी प्रेम कुमार यांच्याशी आपण चर्चा करताना त्यांना संपूर्ण अहवाल सादर केलेला आहे, अशी माहिती तेलेकर यांनी दिली.
पश्चिम घाटात येणाऱया या परिसरात साधारणपणे 45 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या बाजूला पावसापासून संरक्षण देण्यासाठी उतरण तयार करावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मिळून 60 मीटर इतकी जागा व्यापली जाणार आहे. पावसाळय़ात या ठिकाणी दरडी कोसळण्याचा संभव आहे. त्यामुळे हा रस्ता तयार करताना करमल घाट बोडका होईल. या घाटाला काही धार्मिक संकेत असून त्यांच्यावरही परिणाम होईल. वन्यप्राण्यांवर परिणाम होतानाच पाण्याचे स्रोत नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे माणसांबरोबरच वन्यप्राणी आणि वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असे मत गोंयकार संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.