भोंगे हा वरवर धार्मिक आणि राजकीय विषय दिसत असला तरी राज ठाकरे सांगत आहेत तसा सामाजिक विषय आहे. पण मतपेटीच्या राजकारणात एखादी बँक बुडो एखादा चित्रपट निघो, एखाद्या महिलेवर अत्याचार होवो किंवा श्रद्धा-अंधश्रद्धा असोत सारे विषय राजकारणाला, जाती-पातीला आणि मतपेटीला नेऊन भिडवायची आपणाला वाईट सवय लागली आहे. नाटक आणि राजकारण ही मराठी माणसांची आवड आहे. पण राजकारणाची सध्या जी नौटंकी सुरु आहे ती उबग आणणारी आहे. ओघानेच ती निषेधार्थ आहे आणि त्यात सरसावलेल्या सर्वांना जनतेने मतपेटीतून धडा शिकवला आहे. जातीयवाद, द्वेष, लबाडी, घोटाळे, भ्रष्टाचार म्हणजे राजकारण हा समज करुन घरे भरणाऱया व समाज नासवणाऱया तथाकथित धुरीणांना धडा शिकवायची वेळ आली आहे आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देऊ केलेल्या मताच्या अधिकाराचा वापर करुन जनतेने चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हटले पाहिजे. भोंगा हा विषय केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभर ऐरणीवर आला आहे. जसे हवेचे,पाण्याचे प्रदूषण होते तसे ध्वनीचे, विचाराचे, आहार-विहाराचे प्रदूषण होते. मन प्रदूषित झाले, विचार प्रदूषित झाले, आहार-विहार चुकीचा सुरु झाला की समाज आणि सामाजिक जीवन नासायला, उद्ध्वस्त होण्यास सुरुवात होते. वरवर काही गोष्टी आपणास सहज, क्रिया-प्रक्रियेच्या वाटतात पण त्या तशा असतातच असे नाही. त्यामागे एखादे घातचक्र असते. जागतिक स्वरुपाचा कट असतो आणि इच्छा असो-नसो तुम्ही त्यात भरडले जाता जागतिक स्तरावर आलेली महामारी, जगातील मंदी, उद्ध्वस्त अर्थव्यवस्था, बोकाळलेला चंगळवाद, उद्ध्वस्त होऊ पाहत असलेली कुटुंब व्यवस्था, पैशाचे फाजिल महत्व, संस्काराचा ऱहास अशा वेगवेगळय़ा समस्या असल्या तरी खरी समस्या माणूस व माणसांच्या प्रदूषित वृत्ती आहेत. सुखाच्या आणि पैशाच्या मागे लागलेला माणूस सारे गुंडाळून चंगळवादाचा गुलाम झाला आहे. माध्यमापासून, करमणुकीपर्यत सारे या गुलामगिरीचे दास होताना दिसत आहेत. मशिदीवरचा भोंगा व पाच वेळा त्यावरुन दिली जाणारी अजाण हा नवा विषय नाही. गेली अनेक वर्षे त्यावर मंथन होत आले आहे. पण मतपेटीचे राजकारण करणारे या ध्वनीप्रदूषणाबाबत ठोस निर्णय करु शकलेले नाहीत. गाडय़ांचे हॉर्न, रेल्वेची कर्णकर्कश शिट्टी, मिरवणुकीतील डॉल्बी, यात्रा-जत्रा, देवळे, प्रार्थनास्थळे यावरचे कर्कश भोंगे याचा त्रास सर्वांना होतो तो जसा हिंदुंना होतो तसा तो मुस्लीम, ख्रिश्चन, जैन सर्व धर्मियांना होतो. आपण इतक्या धार्मिक गोष्टी ध्वनीवर्धकावरुन लोकांच्या कानावर सतत मारत असतो पण त्यामुळे कुणाचे परिवर्तन सोडा कुणाचे सद्वर्तन झाले असे दिसत नाही. मनाचे असो, विचारांचे असो, धनाचे असो, हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण असो ते वेळीच रोखले नाही तर निसर्ग आपणास माफ करणार नाही. देशात आणि महाराष्ट्रात भोंग्यावरुन तप्त वातावरण आहे तसे हवामानही तप्त आहे. गेल्या शतकातला सर्वांत तप्त एप्रिल आपणास भाजून गेला, कुठे अवकाळी, कुठे विजा, शेतीचे नुकसान, फळबागा उद्ध्वस्त, उष्णतेचे बळी या बातम्या रोज आहेत. पाठोपाठ ढगफुटी, महापूर, दुष्काळ या वार्ताही नेहमीच्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार कोणाचेही असो धर्म कोणताही असो पर्यावरण रक्षण ही सर्वांची धारणा व अग्रक्रम असला आहे. मतपेटीत गुंग सरकारला प्रत्येक गोष्टीत न्यायालयाची थप्पड कशाला हवी. लोककल्याणाचे जे विषय आहेत, देशहिताचे जे निर्णय आहेत ते सर्वांनी एकत्रित येऊन घेतले पाहिजेत. अन्यथा काळ आपणास माफ करणार नाही. राज ठाकरे यांच्या औरंगाबादसह मुंबई-ठाण्याच्या सभा भोंगा या विषयावर होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात बोकाळलेल्या जातीयवादावर बोट ठेवणाऱया होत्या. राज ठाकरे यांनी तेल लावलेल्या राजकीय मल्लाशी कुस्ती सुरु केली आहे. त्यांच्या सभा प्रचंड गर्दीच्या, चर्चेच्या, वादंगाच्या, प्रतिसादाच्या होत आहेत. आपण मराठवाडा व महाराष्ट्र पिंजून काढणार असे म्हणत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे, शरद पवारांचे वस्त्रहरण सुरु केले आहे. ओघानेच राजकीय अस्वस्थता आहे. एकिकडे देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, किरीट सोमय्या, नारायण राणे सरकारी कारभाराचे, कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढत आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे, प्रकाश महाजन हल्लाबोल करत आहेत. आता नाही तर कधीच नाही म्हणत राज ठाकरे यांनी जेथे भोंगा तेथे हनुमान चालीसा अशी आंदोलन घोषणा केली आहे. तीन तारखेला रमजान ईद नंतर चार तारखेचा त्यांनी अल्टीमेटम दिला होता पण महाआघाडी सरकारने राज ठाकरे व मनसे कार्यकर्त्यांना नोटीस देण्याचा धडाका लावला आहे. औरंगाबाद सभेत राज ठाकरे यांचे भाषण सुरु असताना, अजाण सुरु झाल्याने ते संतप्त झाले आणि एकदा होऊनच जाऊ दे असे उद्गारले. महाराष्ट्रात अस्वस्थता आहे. चौका-चौकात आणि जेथे भोंगे तेथे प्रचंड बंदोबस्त अशी स्थिती आहे. कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता ते दाखवू शकतो. धर्म स्थापन झाले तेव्हा स्पीकर नव्हते आणि आज प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आहे. ज्याला हवा तो अजाणचा अलर्ट लाऊ शकतो. प्रासंगिक कारणासाठी कुणाला ध्वनीवर्धक लावायचा असेल तर ते त्यासाठी स्थानिक पातळीवर सुलभपणे परवाना घेऊ शकतील अशी व्यवस्था केली पाहिजे. साधू-संतांचा, विचारवंतांचा आणि भागवत सांप्रदायाचा भेदाभेद अमंगळ म्हणणारा महाराष्ट्र कोणत्याही स्वरुपात प्रदूषित, विचलित होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. लोकशाहीत जनता ही सर्वस्व असते. नियम-कायदे होत असतात. पण स्वयंप्रेरणेने, सामुदायिक शहाणपणाने व्यापक हिताची कृती करण्यास कोणतीही अडचण नाही आपआपल्या पातळीवर सद्वर्तन करण्यास कोणतीच अडकाठी नाही. एखादी चांगली कृती, निर्णय धर्माचा खरा अर्थ लोकांपर्यत जाण्यास परिणामकारक ठरेल. भोंग्याचे राजकारण व्हायचे ते होवो. लोकांनी लोकहिताचे, समाजकारण पेले पाहिजे. सर्व तऱहेचे प्रदूषण रोखले पाहिजे व कृतीशील, आदर्श पायंडे घातले पाहिजेत.
Previous Articleमहाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ (40)
Next Article जर्मनीचे विरोधी पक्षनेते कीव्हच्या दौऱयावर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.