सर्वात मोठय़ा ड्रोन महोत्सवप्रसंगी पंतप्रधान मोदींचे उद्गार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रशासनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने 2014 पूर्वी गरिबांना मोठाच त्रास भोगावा लागला आहे. मात्र आता परिस्थितीत परिवर्तन झाले असून, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गरिबांपर्यंत योजनांचे लाभ पूर्णतः पोहचत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. येथे सर्वात मोठय़ा ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते उपस्थितांना उद्देशून भाषण करीत होते. या ड्रोन महोत्सवात विविध प्रकारांच्या आणि उपयोगांच्या ड्रोन्सचा समावेश आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे देशाच्या कानाकोपऱयांमध्ये राहणाऱया जनतेला सरकारी योजनांचे लाभ, अनुदाने आणि इतर सुविधा पूर्णांशाने पोहचविणे शक्य झाले आहे. अनुदानाची रक्कम थेट गरिबांच्या खात्यात येत असल्याने वितरणातील भ्रष्टाचार संपला आहे. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशातील प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असावा, प्रत्येक शेतात एक ड्रोन असावे आणि प्रत्येक घरात समृद्धी असावी, असे सरकारचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सुशासनावर भर
आठ वर्षांपूर्वी आमच्या सरकारने देशात खऱया अर्थाने सुशासनाचा प्रारंभ केला. किमान शासन, महान सुशासन या मंत्राचे क्रियान्वयन सुरु केले. तसेच जीवन सुसहय़ व्हावे आणि व्यवसाय करणे सहज व्हावे, अशी धोरणे लागू केली. पूर्वीच्या सरकारांनी तंत्रज्ञानाकडे सरसकट दुर्लक्ष केले आणि त्याला गरीबांच्या विरोधी मानले. मात्र आमच्या काळात याच तंत्रज्ञानाचा उपयोग गरीबांपर्यंत साहाय्य आणि अनुदाने पोहचविण्यासाठी आम्ही करत आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.
ड्रोनचा उपयोग सुशासनासाठी
सुशासनसाठी सरकार ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. यामुळे रस्त्यांची सोय नसलेल्या किंवा अलग पडलेल्या गावांमध्ये वैद्यकीय सेवा पोहचविणे सोपे झाले आहे. संपर्कासाठीही त्याचा उपयोग होत आहे. पूर्वीच्या नकारात्मक वातावरणातून आता आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करीत आहोत. पूर्वी रेशनसाठी लोकांना अनेक तास लांबच लांब रांगा लावाव्या लागत. आता तंत्रज्ञानामुळे आणि मुख्य म्हणजे त्याच्या सुशासनाशी संबंध जोडल्याने गरिबांचे त्रास कमी झाले आहेत. मागच्या सरकारांनी तंत्रज्ञान हे केवळ उच्चभ्रूंसाठी आहे अशी समजूत करुन घेतली होती. तथापि आम्ही ते गरीबांसाठी असल्याचे सिद्ध केले. भविष्यातही सुशासनात तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवत नेला जाईल, अशी मांडणी त्यांनी केली.
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
ड्रोन्सच्या साहाय्याने आता प्रत्येक खेडय़ात आणि शहरात स्थावर मालमत्ता आणि भूमी यांचे मापन केले जात आहे. त्यामुळे कोण किती भूमीचा स्वामी आहे, हे नेमकेपणे समजणार आहे. त्यामुळे आजवर देशात 65 लाख मालमत्ता पत्रे (प्रॉपर्टी कार्डस्) डिजिटल मॅपिंगच्या साहाय्याने करण्यात आली असून त्यांचे वितरण करण्यात आले आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी, वैद्यकीय सेवा, दूरवरच्या भागांमध्ये औषधे आणि इतर साहाय्यता पोहचविणे आदी कामांसाठी पेला जात आहे. कोरोना काळात देशभर लसी पुरविण्यासाठी तर ड्रोन हे वरदानच ठरले होते. शिक्षण क्षेत्रातही आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि ड्रोनचाही उपयोग केला जात असून तो लाभदायक ठरला आहे, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
तंत्रज्ञानाचा उपयोग विविधांगी
ड ड्रोन महोत्सवात विविध प्रकारांच्या आणि उपयोगांचा ड्रोन्सचे दर्शन
ड ड्रोनच्या उपयोगामुळे सुशासन वेगवान होण्यास निश्चितच साहाय्य
ड कृषी, वैद्यकीय सेवा व इतर क्षेत्रांमध्ये ड्रोन्सची भूमिका महत्वपूर्ण ड देशाच्या कानाकोपऱयांमध्ये