पुणे / प्रतिनिधी :
सत्ता ओरबाडून घेतली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून सोमवारी येथे केली. तसेच बारामतीत सर्वांचेच स्वागत आहे, असा चिमटाही त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना काढला.
पुरंदर तालुक्यातील राजेवाडी भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. सुळे म्हणाल्या, निर्मला सीतारामन आल्यावर बारामती मतदारसंघासाठी 5 ते 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. देशाच्या एवढय़ा मोठय़ा बजेटमध्ये हजार-दोन हजार कोटी काही मोठी रक्कम नाही. नुकसान प्रचंड झाले आहे, त्यामुळे ती मदत त्यांनी करावी. सुदैवाने सीतारामन या बारामतीला येणार आहेत. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, त्यामुळे जितके पक्ष येतील त्या सर्वांचे आम्ही स्वागतच करू.
अधिक वाचा : दलित मतांवर राजकारण करणं सोपं पण निवडून येणं अवघड
आम्ही कुठले शहेनशहा?
आम्ही कुठले शहेनशहा? मायबाप जनता हीच शहेनशहा आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी भाजपच्या अतुल भातखळकर यांनी केलेल्या टीकेला दिले. भाजपा हा राजा आहे आम्ही तर साधे रंक आहोत, असेही त्या म्हणाल्या.