कोणतीही नोकरी मिळविण्यासाठी मुलाखत द्यावी लागते. महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेपेक्षा मुलाखतीचेच दडपण जास्त असते. तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब सारख्या राज्यामधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थी मुलाखतीमध्ये ठामपणे उत्तरे देण्यात मागे पडतात. याची कारणे शोधल्यास त्यावर उपायही सापडतील.
शालेय शिक्षणामध्ये सभाधीटपणा कधीही शिकवला जात नाही. खरे तर शालेय वर्गात धीटपणे बोलणारी मुले शिक्षकाना अप्रिय असतात. प्रश्न विचारणे, शिक्षकांनी उत्तर दिल्यानंतरही त्यावर उपप्रश्न विचारणे याला शाळेत फारसे प्रोत्साहन मिळत नाही. शिक्षक आदेश देतील तेव्हाच पोपटपंची करणाऱया विद्यार्थ्याना फार मागणी असते. याचे दीर्घकालीन दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या दबून राहण्याच्या वृत्तीमध्ये दिसतात. मित्रमंडळींमध्ये बोलून मित्र जिंकून घेणारी मुले-मुली वर्गात गप्प राहणे पसंत करतात. त्याची कारणे दोन, एक म्हणजे वर्गात बोलणे-प्रश्न विचारणे याला बंदी असते आणि दुसरे म्हणजे ‘चुकीला माफी नाही’ या शिक्षकी वृत्तीमुळे. खरेतर चुकांमधून माणूस घडतो परंतु विद्यार्थ्याना चुका करण्याची मुभा नसते. त्यामुळे गप्प बसण्याचा नियम बऱयाच विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडतो. कॉलेजमध्ये स्वातंत्र्य असले तरी इतक्या वर्षांची सवय कॉलेजच्या पाच वर्षात सुटत नाही. दुसरे कारण म्हणजे proactive ess चा अभाव. शाळा असो वा कॉलेज, स्नेहसंमेलन असो वा कोणा पाहुण्याचे भाषण, आपली वृत्ती शक्यतो मागच्या बाकावर बसण्याची असते. पुढच्या चार रांगा सोडून शक्यतो कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी बसण्याच्या वृत्तीची किंमत पुढे नोकरी मिळवताना चुकवावी लागते. तिसरे कारण मराठी आणि इंग्रजीमध्ये कोणत्याही विषयावर spontaneously आपले विचार किमान पाच मिनिटात मांडणे, या वृत्तीचा अभाव. अपेक्षित साचेबद्ध उत्तरे तोंडपाठ करून देण्याची शिक्षणव्यवस्थेमध्ये इतकी सवय झालेली असते की वेगळ्या प्रश्नावर तत्परतेने उत्तर देताना मुले-मुली गडबडून जातात. मुलींच्या बाबतीत प्रश्न फारच बिकट आहेत. मुली हुशार असूनही त्याना वर्गातील मुले हसतील याची भीती वाटत राहते आणि त्यामुळे त्या अधिकच दबकून राहतात. आजच्या काळात अनेक गावातल्या मुली अजूनही भर वर्गामध्ये सुचेल ते उत्तर द्यायला घाबरतात. याचे प्रतिबिंब मुलाखतीमध्ये दिसते. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व. शब्दसामर्थ्य वाचनामुळे मिळते परंतु वाचनाचा अभाव असल्यामुळे उत्तर देताना योग्य शब्द सुचत नाहीत आणि मुलाखतीमध्ये भंबेरी उडते.
सर्वसाधारणपणे मुलाखत घेणाऱया व्यक्तीला 20 मुलाखतीमधून तीन उमेदवारांची निवड करावयाची असेल तर पहिल्या राउंडची मुलाखत घेणाऱयाचा उद्देश 4 जणांची निवड करणे हा नसतो तर किमान 14 उमेदवार नाकारणे हा असतो. अशा पद्धतीमुळे सहा बऱयापैकी उमेदवारांची निवड आपसूक होते आणि त्यामधून तीन उमेदवार निवडणे सोपे जाते. कोणतीही मुलाखत घेणारी व्यक्ती पहिल्या पाच मिनिटात त्या उमेदवाराबद्दल स्वतःचे मत तयार करते आणि त्यानंतरचे प्रश्न स्वतःचे मत पक्के करण्यासंदर्भात विचारले जातात. “Tell me about yourself’’ अर्थात स्वतःबद्दल पाच-दहा वाक्ये सांगणे, या पहिल्यांदा विचारल्या जाणाऱया प्रश्नाचे उत्तर देण्याची तयारी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी मुलाखत देण्यापूर्वी करत नाहीत. या प्रश्नाचा रोख लक्षात न घेता अनेक उमेदवार स्वतःचे नाव, शिक्षण, कुटुंबातील सदस्य काय करतात, स्वतःचे छंद अशी निरुपयोगी माहिती सांगतात. या प्रश्नाचा रोख सर्वसाधारणपणे या नोकरीसाठी आम्ही तुझीच निवड का करावी, अन्य उमेदवारांच्या तुलनेत तुझ्याकडे असे कोणते गुण आहेत, कोणती वैशिष्टय़े आहेत याची माहिती मिळावी असा असतो. नोकरीच्या अनुषंगाने आपल्यामध्ये असणारे विशेष गुण सांगताना नेहमी मिळणारे उत्तर म्हणजे, “Hard work’’. यामध्ये उमेदवाराला हेच सांगायचे असते की “मी रात्रीचा दिवस करेन’’ पण हे उत्तर वेळेचे व्यवस्थापन नसल्याचे द्योतक आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीच्या पहिल्या पाच मिनिटात आत्मविश्वासाने पण खरी उत्तरे देऊन मुलाखतकाराचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा. फार फुशारक्या मारल्यावर आपण मुलाखतीमध्ये नापास होण्यासाठी मुलाखत घेणाऱयाला संधी देत असतो, याचे भान उमेदवाराने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना ठेवावे. मुलाखत घेणारी व्यक्ती सलग तीन-चार प्रश्न विचारून खोटेपणा उघडकीस आणू शकते कारण मुलाखत देणारा नवखा असतो, घेणारा नसतो.
स्वतःचे छंद सांगताना कोणत्या छंदाबद्दल आपल्याला सविस्तर बोलता येईल, तेच छंद सांगावेत. ‘पुस्तके वाचणे हा माझा छंद आहे’, असे उत्तर देणारे उमेदवार माझ्यासारख्या वाचनाचा छंद असणाऱयासमोर असतील तर माझ्याच मनात विचार येतो, ‘असे उत्तर देऊन आणखी चुका करण्याची संधी का शोधतो आहेस?’’. म्हणूनच उमेदवाराच्या अशा उत्तरावर माझा पुढचा प्रश्न असतो, “गेल्या सहा महिन्यात वाचलेल्या चार पुस्तकांची नावे सांग’’. यावर अनेक उमेदवार श्रीमान योगी, शामची आई, मृत्युंजय, मन में है विश्वास, अशी ठराविक नावे सांगतात, तेव्हाच मुलाखतकाराच्या लक्षात येते की, उमेदवाराला वाचनाचा छंद नाही. अगदीच उमेदवाराला कचाटय़ात पकडायचे असेल तर पुढचा प्रश्न विचारता येतो, “त्यापूर्वीच्या सहा महिन्यात वाचलेल्या चार पुस्तकांची नावे सांग’’. मुलाखत इंग्रजीमध्ये असते त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने मुलाखतीपूर्वीच्या सहा महिन्यामध्ये किमान चार इंग्रजी पुस्तके वाचावीत, त्यामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींची चरित्रे वाचली असतील तर उत्तमच, कारण त्याचा संदर्भ मुलाखतीमध्ये सांगता येतो आणि त्या पुस्तकाबद्दल पाच दहा वाक्यात सारांश सांगता येतो. पुस्तकाबद्दल अधिक माहिती विचारल्यास, आपण त्यामधून काय शिकलो हे अजिबात सांगू नये. त्या पुस्तकाचा सारांश सांगावा. आपल्याला लहानपणापासून इसापनीतीच्या गोष्टीमधून काय शिकलो हे सांगण्याची वाईट सवय लावण्यात आली आहे. त्याचा मुलाखतीमध्ये काहीही उपयोग होत नाही.
इंग्रजीमध्ये बोलणे हा मुलाखतीमध्ये मोठा अडसर असतो, कारण शाळेतले इंग्रजी व्याकरणामध्ये अडकलेले असते त्यामुळे आपल्याला change the voice वगैरे प्रश्नांच्या उत्तरामध्ये मार्क मिळालेले असतात परंतु इंग्रजीमध्ये विचार करून इंग्रजीमधून पाच-दहा वाक्यात व्यक्त होणे विद्यार्थ्याना तत्परतेने जमत नाही. CMA (म्हणजे पूर्वीचे ICWA) करू इच्छिणाऱया आणि कॉमर्समध्ये पहिल्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थिनीला मी प्रश्न विचारला, ‘मी भिंतीला टेकून फार वेळ उभे राहू शकत नाही’ हे वाक्य इंग्रजीमध्ये करून दाखव. यावर ती म्हणाली, “हे वाक्य आमच्या अभ्यासक्रमात अजून आलेले नाही.’’ थोडक्यात, बोली भाषेतील वाक्ये आपल्याला इंग्रजीमध्ये सहजगत्या बोलता येत नाहीत. ते कौशल्य मिळवण्यासाठी रोज आरशासमोर उभे राहून आयत्या वेळी सुचलेल्या कोणत्याही विषयावर सलग दहा मिनिटे इंग्रजीमध्ये बोलण्याचा सराव करावा. त्यानंतर आरशासमोर खुर्चीवर बसून टेबलावर हात ठेवून सायन्स/कॉमर्स मधील वेगवेगळ्या संज्ञा इंग्रजीमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर, आपण स्टेजवर उभे आहोत आणि हातात माईक नाही असे समजून स्वतःबद्दल, आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल किमान पंधरा मिनिटे इंग्रजीमध्ये बोलावे.
बोलण्याच्या कौशल्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे मुद्देसूद आणि मोजके बोलता येणे. दोन्ही बाबतीत बऱयाच उमेदवारांची पंचाईत होताना दिसते. “आवडता खेळाडू कोण आणि का?’’ या प्रश्नावर “रॉजर फेडरर’’ हे उत्तर द्यायचे असल्यास फेडररच्या विंबल्डन सामन्याचे धावते समालोचन देऊ नये. त्याचे पाच गुण क्रमाने सांगता येणे गरजेचे आहे. “आवडता खेळ कोणता आणि का?’’ या प्रश्नाला क्रिकेट असे उत्तर देणे सोपे आहे परंतु त्याची पाच कारणे सांगणे कठीण आहे. मोजके बोलणे याचा अर्थ आपल्या उत्तराला पाच किंवा दहा वाक्यानंतर पूर्णविराम देणे आणि आपले उत्तर संपले आहे हे मुलाखत घेणाऱयाला न सांगता कळवणे. “Tell me about yourself” या प्रश्नाला उत्तर देताना बरेच उमेदवार स्वतःचा आणि कुटुंबाचा इतिहास सांगत राहतात आणि मुलाखत घेणाऱयाला, याचे उत्तर कधी संपणार याची वाट बघत बसावे लागते. त्याचक्षणी मुलाखत घेणाऱयाने या उमेदवाराचे काय करायचे याचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे स्वतःबद्दल 50 वाक्ये लिहावी, त्यातील महत्वाची नसलेली 30 वाक्ये काढून टाकावी आणि त्यानंतर 20 पैकी महत्वाच्या दहा वाक्यांची उत्तम पुनर्रचना करावी. पंडित भीमसेन जोशी यांना प्रश्न विचारला होता की स्टेजवरचे गायन आणि रियाज यामध्ये काय फरक असतो? त्यावर पंडितजींनी फार विचार करण्यासारखे उत्तर दिले आहे. आपल्याला जे येते ते स्टेजवर सादर करावे आणि आपल्याला जे येत नाही, अवघड जाते, त्याचा रियाज करावा. मुलाखतीच्या बाबतीतही हे तत्व तंतोतंत लागू पडते. अशा मुलाखतीला निमंत्रण येण्यापूर्वी आपला बायोडेटा तयार करणे हे सर्वात सोपे वाटणारे काम सर्वात कठीण असते, त्याबद्दल पुढील लेखामध्ये.
सुहास किर्लोस्कर