प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम हा उच्च शिक्षण, आरोग्य, व मूल्यांचा विकास यांसारख्या घटनांवर होणार आहे. विद्युतीकरण लोकार्पण सोहळय़ाचा हा दिवस हा ऐतिहासिक आहे आणि या क्षणाचे आपण सर्वजण साक्षी बनलो आहोत. रेल्वेचे झालेले विद्युतीकरण हा लोकांच्या राहणीमान व व्यापार या दोहोंना बळ देणारा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यानच्या 740 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकरण झालेल्या कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून दुपारी दृकश्राव्य माध्यमातून पार पडला. ऑनलाईन कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच केंद्रीय सचिव प्रल्हाद जोशी आदी उपस्थित होते. या राष्ट्रार्पण सोहळ्यानंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी खुला झाला. यासाठी रत्नागिरी, मडगाव तसेच उडूपी येथे इलेक्ट्रीक ट्रकवरील रेल्वे गाडय़ांना रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवला गेला. रेल्वेच्या विद्युतीकरणामुळेच वेळेनुसार चांगली स्थित्यंतरे होणारी भारतीय रेल्वे ही आता अधिक गतिमान, स्वच्छ, शहरीपणाशी मैत्री जपणारी व उन्नत असणारी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.
गेल्या कित्येक दिवसांपासून कोकण रेल्वेच्या अनेक कर्मचाऱयांनी अहोरात्र काम करून वेळेवर पूर्ण केलेल्या 100 टक्के विद्युतीकरण मार्गिकेच्या कामाचा उद्घाटन कार्यक्रम रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळूर येथून दृकश्राव्य माध्यमातून हिरवा झेंडा दाखवताच रत्नागिरी रेल्वेस्थानक येथूनही फुलमाळांनी आकर्षक सजावट केलेली पहिली रेल्वेगाडी विद्युतीकरण केलेल्या मार्गावरून सिंधुदूर्गकडे रवाना करण्यात आली. या कार्यक्रमावेळी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, मिरजोळे ग्रा. पं. सरपंच गजानन गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान या कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणात रेल्वे पदाधिकारी तसेच कर्मचारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, पदाधिकारी सचिन वहाळकर, ऍड. बाबा परुळेकर, सचिन करमरकर आदी उपस्थित होते. रत्नागिरी रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्र.1 येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी बेंगळूर येथील लोकार्पणाचा हा भव्य सोहळा मोठय़ा स्क्रिनवर उपस्थितांना दाखवण्यात आला. रत्नागिरी रेल्वेस्थानकावरून विद्युतीकरणातील रेल्वेगाडी रवाना होताच उपस्थित साऱयांनीच टाळय़ांचा कडकडाट केला.
कोकण रेल्वेच्या प्रदुषणमुक्त प्रवासाला प्रारंभ
भारतीय रेल्वेच्या सात प्रकल्पाचा फायदा युवक, शेतकरी, मध्यम वर्ग यांच्यासह उद्योजकांना नव्या सुविधांच्या रुपाने मिळणार आहे. कोकण रेल्वे समस्त कोकणवासियांच्या पर्यटनाचे व व्यापाराचे साधन आहे. म्हणूनच तिला सामान्य्नांची रेल्वे असे ओळखले जाते. निसर्गाने व अनेक पर्यटनस्थळांनी सजलेल्या कोकणाचा आस्वाद पर्यटकांना बिनधोक व प्रदूषण पणे घेता यावा यासाठी कोकण रेल्वेचा मार्ग हा विद्युतीकरणासाठी सज्ज झाला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवून कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण झालेल्या मार्गिकेचे लोर्कापण केले. आता रेल्वे यामुळे अधीक गतिमान होणार आहे. ऐन पावसाळ्यात कोकणात येणाऱया पर्यटकांना प्रदूषणमुक्त प्रवास रेल्वेतून करता येणार आहे.