पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये जाणे दुर्दैवी आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना मोठय़ा प्रकल्पाचे आश्वासन दिल्याचे मी ऐकले आहे. पण फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प देतो, असे सांगणे म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाची समजूत काढण्यासारखे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार म्हणाले, उद्योगांमध्ये महाराष्ट्र पहिल्यापासूनच प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. येथील नेतृत्वामुळे नेहमीच राज्यात नवनवे आणि मोठे प्रकल्प यायचे. पण सध्या मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. जे झाले ते दुर्दैवी आहे. फोनवर बोलल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना म्हणे पंतप्रधानांनी दुसरा मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन दिले आहे. कुटुंबात दोन लहान मुले असतात. एकाला फुगा दिल्यानंतर दुसरा रुसून बसतो. त्यावर पालक सांगतात तुला त्याच्यापेक्षा मोठा फुगा देतो, असे या सरकारचे झाले आहे.
अधिक वाचा : मसूर दरोड्यातील 7 जणांसह सोनारावर मोक्का, सोनाराविरुद्ध मोक्काची राज्यातील पहिलीच कारवाई
फॉक्सकॉन प्रकल्प पुण्याच्या तळेगावला होणार होता. तळेगावची जागा हीच प्रकल्पासाठी योग्य होती. परंतु, असे असताना राज्यातला प्रकल्प गुजरातला गेला. महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला जायला नको होता. पण आता प्रकल्प बाहेर गेला आहे. त्यामुळे जास्त बोलण्यात अर्थ नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दोघेही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात आवश्यक पावले उचलली गेली नाहीत, असे ते सांगत आहेत. पण, ठाकरे सरकारमध्ये दोन्ही नेते मंत्री होते. हे ते सोयीस्करपणे विसरत आहेत, अशी टीका पवार यांनी शिंदे आणि सामंत यांच्यावर केली.
यापुढे नवीन प्रकल्पांसाठी प्रयत्न करा
यात आता काही पर्याय मला दिसत नाही. काही लोकांनी सांगितले, की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. त्यामुळे आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. सध्याचे राज्याचे नेतृत्व आम्हाला गरज नाही,. अशाप्रकारचे दिसत आहे. भांडवली गुंतवणुकीस योग्य वातावरण आतापर्यंत देशात महाराष्ट्राने निर्माण केले आहे. ‘काय झाडी, काय हवा’ हे रोज म्हणण्यापेक्षा आणि वाद घालण्यापेक्षा राज्याच्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्रित येऊन विकासावर चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन नवीन गुंतवणूक प्रकल्प राज्यात आणले पाहिजेत. यापुढे नवीन प्रकल्प कसे येतील, यावर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला पवार यांनी दिला.
वेदांताकडून हा पहिला प्रकार नाही
कंपनीला आपली कंपनी कुठे चालवायची, हा त्यांचा अधिकार आहे. मला यात काही नवीन वाटत नाही. या देशात एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प रत्नागिरीत करण्याचा निर्णय झाला होता. तो प्रकल्प वेदांताचा होता. त्यावेळी स्थानिकांचा थोडा विरोध झाला, की त्यांनी तो चेन्नईला नेला होता. ही जुनी गोष्ट आहे. त्यामुळे वेदांताकडून ही पहिली गोष्ट झालेली नाही. त्यामुळे वेदांताचा प्रकल्प येत असेल, तर शेवटपर्यंत त्याची खात्री देता येत नाही, अशी जुनी आठवणही पवार यांनी या वेळी सांगितली.
कुठल्याही माणसाला घराची ओढ असतेच : पवारांचा मोदी-शहांना टोला
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचा गुजरातला लाभ मिळाला असेल, तर त्याची तक्रार करण्याची गरज नाही. तसेच कुठल्याही माणसाला घराची ओढ असते. साधारणतः केंद्राची सत्ता हातात असण्याचे परिणाम काही राज्यांसाठी अनुकूल होत असतात. नरेंद्र मोदी, अमित शहा तिथले आहेत, हे मोठे लोक आहेत. त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. त्यामुळे त्यांनी थोडे जास्त लक्ष गुजरातकडे दिले, तर आपण समजू शकतो. तुम्ही मोदी यांचे दौरे पाहा. ते जास्तीत जास्त कुठल्या राज्यात जातात, याचे दोन-तीन महिन्यांचे रेकॉर्ड काढले, तर तुम्हाला ते कळेलच. कुठल्याही माणसाला घराची ओढ असते, अशा शब्दांत पवारांनी मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधला.