वार्ताहर/ येळ्ळूर
येथील छत्रपती शिवाजी चौकातील अतिक्रमणाचा प्रश्न गावकऱ्यांचा एकमुखी पाठिंबा, पीडीओ पूनम गडगे यांनी घेतलेली ठोस भूमिका, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य, अतिक्रमणकर्ते यांनी घेतलेल्या सामंजस्य आणि सहकार्याच्या भूमिकेमुळे अखेर मार्गी लागला. यामुळे छत्रपती शिवाजी चौकाच्या सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा झाला असून गेल्या वीस वर्षाच्या समस्येवर अखेर पडदा पडला.
येथील छत्रपती शिवाजी चौकात भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारला असून त्याच्या समोरच देवी लक्ष्मीचा गदगेवर बसण्याचा चौथरा आहे. चौथऱ्याच्या मागील बाजूस देसाई आणि पाटील मंडळींची वहिवाट आहे. या ठिकाणी अतिक्रमण करून शेणखत टाकल्यामुळे दलदल साचून दुर्गंधी सुटली होती. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा आणि लक्ष्मीचा चौथरा हे नागरिकांचे श्रद्धास्थान असून साचलेल्या दलदलीमुळे नागरिकांच्या आणि श्रद्धाळुंच्या मनाला ठेच पोचत होती. ही दलदल व दुर्गंधी दूर करून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी सातत्याने होत असूनही यातून मार्ग निघत नव्हता. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचे सुर उमटत होते.
गेले दोन दिवस दोन्ही बाजूनी सुरू असणाऱ्या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघत नव्हता. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ही समस्या पुन्हा खितपत पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, पीडीओ, ग्राम पंचायत सदस्य, सार्वजनिक गाव कमिटी, लक्ष्मी यात्रा कमिटी व चांगळेश्वरी यात्रा कमिटी यांच्या अध्यक्ष आणि सदस्यानी गेले दोन दिवस पुन्हा पुन्हा बैठका घडवून आणल्यामुळे हळूहळू दोन्ही बाजूकडून सामंजस्य आणि सहकार्याची भूमिका निर्माण झाली आणि शेवटी यातून सुवर्णमध्य काढण्यात यश आले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. चर्चेदरम्यान हे देवीच्या चौथऱ्याचे काम आहे. आडकाठी आणून विकास कामांना बाधा आणू नका, सर्वांच्याच भावना या श्रद्धास्थानी आहेत. दोन्ही बाजूनी सहकार्य व्हावे या आवाहनाला साथ दिल्याने ही समस्या कायमची मिटली.
यावेळी पीडीओ पूनम गडगे, अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सार्वजनिक गाव कमिटी, लक्ष्मी यात्रा कमिटी, चांगळेश्वरी यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रा.पं. सदस्य सतीश पाटील, जोतिबा चौगले, रमेश मेणसे, विलास बेडरे, शालन पाटील, वनिता परिट, परशराम परिट, मनिषा घाडी, राजु डोण्याण्णावर, दयानंद उधडे, शशीकांत धुळजी, शिवाजी नांदूरकर, शांता काकतकर, राकेश परीट, अरविंद पाटील, सुनिल अरळीकट्टी, प्रदीप सुतार, राजकुंवर पावले, रूपा पुण्याण्णावर, कलाप्पा मेलगे यांच्यासह नागरिकांनी मोठ्यासंख्येने सहभाग घेतला.