फेरीवाले, वाहनांच्या रांगा अशातच प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे गणपत गल्लीच्या परिसरात नागरिकांची गर्दी वाढत आहे. अशातच प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाची रेलचेल होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या परिसरात रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने रिक्षाचालकांची गर्दी वाढत असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.
बाजारपेठेत विविध परिसरातून नागरिक येत असतात. विशेषतः शेजारी असलेल्या परराज्यातून देखील खरेदीसाठी येणाऱया नागरिकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात आहे. अशातच गणपत गल्ली आणि बाजारपेठेत फेरीवाल्यांची गर्दी वाढत आहे. रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात. तसेच दुतर्फा दुचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे एखाद्या दुकानामध्ये जाण्यासाठी देखील रस्ता नसतो. गणपत गल्लीत पादचाऱयांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असते. अशातच प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षांची रेलचेल वाढली आहे. शनिवार खुट ते नरगुंदकर भावे चौकपर्यंतच्या गणपत गल्ली रस्त्यावर रिक्षा फिरतात. प्रवाशांच्या शोधात हळू जाणाऱया रिक्षांमुळे वाहनधारकांना अडथळा होत आहे. काहीवेळा पादचाऱयांना जाण्यासाठीही रस्ता नसतो.
उपाययोजना राबविण्याची मागणी
गणपत गल्ली दरम्यान 20 ते 25 रिक्षा एकामागोमाग फिरत असतात. त्यामुळे कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रहदारी पोलिसांची नियुक्ती केली जाते. पण या दरम्यान रहदारी पोलीस नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. प्रवासी घेण्यासाठी रिक्षा थांबवल्यास पाठिमागून येणाऱया वाहनांची रांग लागते. त्यामुळे बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.