38 कर्मचाऱयांना आदेशपत्रे, मरण पावलेल्या 12 कर्मचाऱयांच्या वारसदारांनाही नियुक्तीपत्रे
प्रतिनिधी /मडगाव
कदंब महामंडळ कर्मचाऱयांच्या बराच काळ प्रलंबित राहिलेल्या बढत्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून 38 कर्मचाऱयांना बढत्यांची आदेशपत्रे कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. सेवेत असताना मरण पावलेल्या 12 कर्मचाऱयांच्या कुटुंबांतील सदस्यांनाही सेवेत सामावून घेण्यात आले आहे.
कदंब महामंडळाच्या पर्वरीतील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात तुयेकर यांनी सदर आदेशपत्रे कर्मचाऱयांना प्रदान केली. मरण पावलेल्या कर्मचाऱयांच्या कुटुंबांतील ज्या सदस्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे त्यात दोन महिलांचा समावेश आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. यापैकी एका महिलेची वाहकपदी, तर एका महिलेची कारकूनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महामंडळातील कर्मचाऱयांच्या बढत्या बराच काळ प्रलंबित होत्या. या कर्मचाऱयांपैकी 8 वाहतूक नियंत्रकांची साहाय्यक वाहतूक निरीक्षकपदी (एटीआय), तर 30 वाहकांची वाहतूक नियंत्रकपदी बढती करण्यात आली आहे. बराच काळ प्रलंबित राहिलेल्या बढत्या मिळाल्यामुळे कर्मचाऱयांना हुरूप आला आहे. याचा सकारात्मक परिणाम महामंडळाच्या कारभारात पुढे दिसून येईल, असा विश्वास तुयेकर यांनी व्यक्त केला.
महामंडळाच्या सेवेत 30-35 वर्षे होऊनही बढती मिळाली नव्हती. पण अध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर तुयेकर यांनी प्रलंबित बढत्यांची प्रक्रिया प्राधान्यक्रमाने पूर्ण करून न्याय दिल्याबद्दल कर्मचाऱयांनी तुयेकर यांचे यावेळी आभार मानले. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरेक नॅटो व सरव्यवस्थापक संजय घाटे यांचेही कर्मचाऱयांनी आभार मानले. बढती मिळालेल्यांपैकी चार जण पुढील महिन्यात सेवेतून निवृत्त होणार आहेत. निदान सेवाकाळाच्या अखेरीस का होईना बढती मिळाल्याचे समाधान लाभले, अशी प्रतिक्रिया या कर्मचाऱयांनी व्यक्त केली आहे.