कारवार बसस्थानकाची स्वच्छता-देखभालीकडे दुर्लक्ष : कांही ठिकाणची जलशुद्धिकरण केंद्रे बंद अवस्थेत, दुरुस्तीची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेस्थानक परिसरात बस प्रवाशांच्या सुविधेसाठी कारवार बसस्थानकाचा विकास करण्यात आला आहे. मात्र बसस्थानकाच्या स्वच्छेतेकडे कॅन्टोन्मेंट बोर्डने कानाडोळा केला असल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. स्मार्ट बसस्थानक बनविण्यासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र सध्या अस्वच्छतेमुळे बसस्थानकाचे स्मार्टपण हरवले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यावधी निधी खर्च करून विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. मात्र उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने स्मार्टसिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले प्रकल्प धूळखात पडले आहेत. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत शहरात स्मार्ट बसथांब्याची उभारणी करण्यात आली आहेत. मात्र बसथांब्यावर भटकी जनावरे ठाण मांडत असल्याने अस्वच्छता निर्माण होत आहे. तसेच शहरवासियांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी जलशुद्धिकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पण बहुतांश जलशुद्धिकरण केंद्रे बंद पडली असून काही ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने वापर होत नाही. याठिकाणी बसविण्यात आलेली यंत्रणा काही महिन्यात निकामी बनली आहे. त्यामुळे जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यासाठी खर्ची घातलेला निधी वाया गेला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. स्मार्ट बसथांब्यावर इ-टॉयलेटची उभारणी करण्यात आली आहेत. पण नळजोडणी तसेच विद्युत जोडणी करण्यात आली नसल्याने चार ठिकाणी उभारण्यात आलेले इ-टॉयलेट धूळखात पडली आहेत.
रेल्वे स्थानकासमोरील जीर्ण झालेल्या कारवार बसस्थानकाच्या विकासासाठी स्मार्टसिटी योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली. तसेच बसस्थानक परिसरात व्यापारी गाळ्यांची उभारणी करून संपूर्ण बसस्थानकाचा कायापालट करण्यात आले आहे. मात्र या बसस्थानकाची देखभाल केली जात नसल्याने सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. बसस्थानकावर कचरा साचला असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनावेळी बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले होते. पण वर्ष होत आले तरी या बसस्थानकाचे हस्तांतर परिवहन मंडळाकडे करण्यात आले नाही. परिणामी याठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली असून काही मोजक्मयाच बस याठिकाणी थांबत आहेत. याठिकाणी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या मोडकळीस आल्या आहेत. येथील देखभालीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डने दुर्लक्ष केल्याने दुरवस्था झाली आहे.
स्मार्टसिटी बनविण्यासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात आला. पण देखभालीअभावी सर्वप्रकल्प धूळखात पडले आहेत. प्रकल्पाच्या उभारणीसाठी खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला असल्याची टीका नागरिक करीत आहेत. कोटीचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या देखभालीसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.