वाहतुकीला धोका, निकृष्ट कामे ढासळत चालल्याने संताप
प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणाला तडे, कामथे घाटात खचलेला रस्ता, पेढेत कोसळलेला भराव या सारख्या घटना एकापाठोपाठ एक घडत असतानाच मंगळवारी सायंकाळी कळबस्ते अंडरपासजवळील संरक्षक भिंत आडवी झाली. या सर्व प्रकारांमुळे महामार्गाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
महामार्गावरील खड्डय़ांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता कोसळत असलेल्या बांधकामांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. कामथे घाटात काँक्रीटीकरणाला तडे जाण्याबरोबरच एका ठिकाणी रस्ताच खचल्याने तूर्तास मार्ग बंद ठेवावा लागला. गेल्याच आठवडय़ात सवतसडा धबधब्याजवळील मोरीलगतचा मातीचा भराव कोसळला. मंगळवारी सायंकाळी पावसाळय़ापूर्वीच बांधण्यात आलेली 15 फूट ऊंचीची कळंबस्ते येथील संरक्षक भिंत आडवी झाली आहे.
अधिकारी, कंत्राटदारांना केला सवाल
कोसळलेल्या संरक्षक भिंतीची माजी सभापती शौकत मुकादम, कळंबस्ते सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडिक, ग्रामपंचायत सदस्य अंकुश शिगवण, हेमंत कोळंबेकर आदींनी पाहणी करत महामार्ग अधिकाऱयांशी चर्चा केली. महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच करण्यात येत असलेली बांधकामे कोसळत असल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न मुकादम यांनी अधिकारी, कंत्राटदारांना विचारला आहे.