उचगावच्या केवळ आठच शेतकऱ्यांचे म्हणणे घेतले ऐकून : काही शेतकऱ्यांना पुन्हा बजावण्यात येणार नोटिसा
बेळगाव : रिंगरोडसंदर्भातील सुनावणीला नियमित सुरुवात झाली तरी विविध कारणांनी ही सुनावणी पुढे ढकलू लागली आहे. शुक्रवारी उचगावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार होते. मात्र, प्रांताधिकाऱ्यांनी केवळ आठच शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून इतर शेतकऱ्यांना सुनावणीसाठी पुन्हा नोटीस पाठविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शुक्रवारीही काही शेतकऱ्यांना रिकाम्या हातीच घरी परतावे लागले. रिंगरोडसाठी तालुक्यातील 32 गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेण्याचा घाट घालण्यात आला. शेतकऱ्यांनी विरोध केला असतानाही पुन्हा नोटिसा पाठवून त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या रिंगरोडसाठी आम्ही तुमच्या जमिनी घेणार आहोत. त्यामुळे तुमचे काय म्हणणे आहे? हे मांडा, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक गावातील शेतकरी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात उपस्थित राहून आपले म्हणणे मांडू लागला आहे.
बऱ्याचवेळा शेतकरी वेळेवर उपस्थित राहतात. मात्र अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. गुरुवारी बिजगर्णी, नावगे या गावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. तर शुक्रवारी उचगावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रांताधिकारी रमाकांत चव्हाण हे उपस्थित होते. मात्र, काही कारणास्तव केवळ आठच शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांनी तेथून काढता पाय घेतला. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना पुन्हा नोटिसा देऊ, असे सांगितले. शेतकऱ्यांच्यावतीने म्हणणे नोंदवून घेण्यासाठी अॅड. एम. जी. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. श्याम पाटील, अॅड. महेश मोरे, अॅड. प्रसाद सडेकर उपस्थित होते. उचगावमधील काही शेतकरी उशिराने आले. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता पुढील तारीख देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
आज मुचंडी गावचे शेतकरी मांडणार म्हणणे…
रिंगरोडमध्ये मुचंडी गावातील शेतकऱ्यांची तिबारपिकी जमीन जाणार आहे. त्यामुळे मुचंडीतील शेतकऱ्यांनीही रिंगरोडला विरोध दर्शविला आहे. शनिवारी मुचंडीचे शेतकरी म्हणणे मांडणार आहेत. त्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन वकिलांनी केले आहे.