गोवा फॉरवर्डचा आरोप, पंतप्रधानांना लिहिले पत्र
प्रतिनिधी/ पणजी
तूरडाळ, साखर यासारख्या कोटय़वधींचे घोटाळे हे राज्याच्या कोलमडलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे लक्षण आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पार्टीने केली आहे.
पणजीत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तूरडाळ आणि साखर घोटाळ्यांमुळे राज्यांची सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडली असून केंद्र सरकारच्या ताज्या एनएफएसए क्रमवारीत तर 20 सामान्य श्रेणीतील राज्यांमध्ये गोव्याला शेवटचे स्थान देण्यात आले आहे. खुद्द भारत सरकारनेच हे प्रमाणित केले आहे. त्यावरून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे हे अपयश आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
दरम्यान, तूरडाळ घोटाळ्यासंबंधी गोवा फॉरवर्डने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या घोटाळ्याची केंद्रीय एजन्सीद्वारे स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली असून पंतप्रधान कार्यालयाने त्याची त्वरित दखलही घेतली आहे.
प्रमोद सावंत यांनी गोव्यातील यापुढे ‘डबल इंजिन सरकार’ हा शब्दप्रयोग वापरणे बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली. या दोनपैकी केंद्रातील इंजिनाने गोव्यातील इंजिन आउट-ऑफ ऑर्डर असल्याचा पर्दाफाश केला आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
‘राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक सरासरी दरडोई उत्पन्नात गोव्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे, तर दुसरीकडे गोव्याच्या लोकसंख्येच्या 1/3 म्हणजेच सुमारे 5,42,799 लोक रेशनवर अवलंबून आहेत. याचा अर्थ गोव्यात उत्पन्नातील असमानतेत मोठा फरक दिसून येत आहे. त्यामुळे गोव्यातील गरिबांना 2013 पासून एनएफएसए अंतर्गत हमी दिलेला अन्नाचा अधिकार या कायद्यातील सर्व तरतुदी लागू करून सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.