पुणे / प्रतिनिधी :
रांगोळ्यांच्या पायघड्या..फुलांनी सजविलेले आकर्षक रथ…नेत्रदीपक रोषणाई…नितांतसुंदर देखावे…बाप्पा मोरयाचा जयघोष…ढोल ताशांचा गजर..अन् गणेशभक्तांचा अलोट उत्साह…अशा अत्यंत भारलेल्या वातावरणात पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची विक्रमी 30 तासांनी सांगता झाली.
कोरोनानंतरच्या निर्बंधमुक्त वातावरणात दोन वर्षांनी विसर्जन मिरवणूक पार पडली. मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची प्रशासनाकडून आरती करून सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार गिरीश बापट, विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे व अन्य मान्यवर उपस्थित होते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र विसर्जन मिरवणुकीत दिसून आले.
सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. चांदीच्या पालखीमध्ये विराजमान कसबा गणपतीचे सव्वा अकराच्या सुमारास बेलबाग चौकात आगमन झाले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास अलका चौकात गणरायाचे आगमन झाले. त्यानंतर 4.18 मिनिटांनी गणपतीचे घाटावर विसर्जन झाले. मानाच्या दुसर्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे सव्वा पाचच्या सुमारास, तर मानाच्या तिसर्या गुरुजी तालीम गणपतीचे सातच्या सुमारास विसर्जन झाले. फुलांच्या आकर्षक सजावटीने साकारलेल्या श्री गजमुख रथात विराजमान मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपताचे साडेआठच्या सुमारास विसर्जन झाले. तर मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे नऊच्या सुमारास विसर्जन झाले.
मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर गणेशभक्तांची पाऊले आपोआप दगडूशेठ, मंडई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने वळतात. अखिल मंडई मंडळाच्या पुढे जिलब्या मारुती मंडळ, बाबूगेनू मित्र हि मंडळे होती. रात्री दोननंतर मिरवणुकीत हि मंडळे दाखल झाली. जिलब्या मारुती मंडळाची आकर्षक मूर्ती पाहून गणेशभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यानंतर बाबूगेनू मित्र मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाली. काल्पनिक महालाच्या प्रतिकृतीमध्ये गणेशाची मूर्ती विराजमान होती. हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती असलेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती लक्ष्मी रस्त्यावर येताच उत्साह अधिकच दुणावला. आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ, त्यावर रणशिंग पुष्प चौघडा आणि रथावरील गणरायाची तेजस्वी मूर्ती पाहून गणेशभक्तांचे हात जोडले गेले. या वेळी कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी करण्यात आली. शिवयोद्धा मर्दानी आखाडा यांच्या बाल कलाकारांकडून लाठी-काठी, तलवार बाजी, भाला खेळ अशा विविध साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तर समर्थ, नादब्रम्ह आणि श्रीराम या ढोल ताशा पथकाने वातावरण दुमदुमून सोडले. शनिवारी सकाळी 9.30 च्या सुमारास श्रींचे विसर्जन झाले.
अखिल मंडईचा गणपती ‘अमोघ त्रिशक्ती नाग रथा’तून सकाळी 6.30 वाजता बेलबाग चौकात दाखल झाला. रथावरील ब्रम्हा, विष्णू व महेशाच्या त्रिमूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होत्या. नागाच्या वेटोळय़ामध्ये शारदा गजानन विराजमान झाले होते. जयंत नगरकर बंधू यांचा सनई चौघडा, गंधर्व बँड, शिवगर्जना वाद्य पथक, नादब्रह्म पथक आणि परशुराम ढोल ताशा पथकाने जोरदार वादन करीत उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे हजारो मोतिया रंगाच्या व एलईडी दिव्यांनी उजळलेल्या ‘श्री स्वानंदेश रथा’तtन आगमन झाले. सकाळी 7.45 ला दगडूशेठ हलवाई गणपतीचा रथ बेलबाग चौकात दाखल झाला. त्यावेळी गणेशभक्तांनी एकच जल्लोष केला. या वेळी गणेशभक्त नतमस्तक झाले. स्व-रूपवर्धिनी पथक, ध्वज, टाळ यांसह मर्दानी खेळ व ढोल-ताशा पथक, दरबार ब्रास बँड, प्रभात ब्रास बँड यांच्या सुरावटाRनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले. उपस्थितांची मने जिंकली. केरळच्या चंडा या पारंपारिक वाद्यांचा समूहदेखील मिरवणुकीत सहभागी झाला होता. अलका चौकामध्ये सकाळी 10 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास मुख्य रथाचे आगमन होताच मोरया, मोरया…जय गणेश असा जयघोष झाला. श्रींची विलोभनीय मूर्ती गणेशभक्तांनी डोलाट साठवली. त्यानंतर 11 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रींचे विसर्जन झाले.