दोन महिन्यापासून संततधार सुरू असलेल्या पावसाची विश्रांती : खानापूर बाजारात लोकांची गर्दी
खानापूर : गेल्या दोन महिन्यापासून संततधार सुरू असलेल्या पावसाने रविवार दि. 28 रोजी बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण आणि हवेत गारठा असल्यामुळे पुन्हा पाऊस होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने नदीच्या पातळीत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने खानापूर शहरातील नागरिक धास्तावले होते. मात्र शनिवारी आणि रविवारी पावसाने उसंत घेतल्याने शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले होते. रविवारी खानापूरच्या बाजारात बऱ्यापैकी लोकांची गर्दी दिसून येत होती. गेल्या दीड-दोन महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पंधरा दिवसापासून मुसळधार कोसळत असल्याने नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. गेल्या आठवड्यात अनेक पुलांवर पाणी येऊन खानापूरशी संपर्क तुटलेला होता. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मागील पूर्ण आठवडा शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. आज सोमवारपासून पुन्हा शाळा-महाविद्यालयांना सुरुवात सुरू होणार आहे.
भुईमूग पीक पूर्णपणे वाया, रताळी पिकालाही धोका
गेल्या पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आणि ठप्प झाले होते. त्याचबरोबर खरीप हंगामही धोक्यात आला होता. जर पाऊस असाच पडत राहिल्यास खरीप पिकावर मोठा परिणाम होणार असून खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस पूर्णपणे थांबण्याची वाट पहात आहे. भात, रोप लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पाऊस पुढील काही दिवस पूर्णपणे थांबणे गरजेचे आहे. अन्यथा भात पिकासाठी धोका निर्माण होणार आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहिल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच भुईमूग पीक पूर्णपणे वाया गेले आहे. तसेच रताळी पिकालाही धोका निर्माण झाला आहे.
जनजीवन सुरळीत, आजपासून शाळा सुरू
शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी मलप्रभेच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. घाटाच्या वर पाणी आले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना 2020 आणि 2021 च्या पुराची धास्ती अजून आहे. त्यामुळे पाणी पातळीत झालेली वाढ पाहता शहरवासीय चिंतेत होते. मात्र शनिवारी दिवसभर पावसाचा जोर एकदम ओसरला होता. तसेच रविवारीही पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने पाणीपातळी कमी झाली आहे. आणि शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मलप्रभेची पाणीपातळी कायम स्थिर राहिली आहे. फक्त शनिवारी तेवढीच मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. शनिवारी आणि रविवारी पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन सुरळीत झाले असून शाळाही आजपासून सुरू होणार आहेत.