नदीनाले, शेतशिवारात पाणी तुडुंब : शुक्रवारी सकाळी किंचीत विश्रांती, दुपारनंतर पुन्हा पाऊस : कोवळय़ा पिकांचे होणार नुकसान शेतकरी चिंतेत
वार्ताहर /किणये
गेल्या 10-12 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर तालुक्याच्या पश्चिम भागात पुन्हा वाढला आहे. यामुळे नदीनाले तुडुंब भरुन वाहू लागले आहे. शेतशिवारात पाणी साचले आहे. शुक्रवारी सकाळी किंचीत पावसाने विश्रांती घेतली. मात्र दुपारीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. इतर भागाच्या तुलनेत तालुक्याच्या पश्चिम भागात अधिक पाऊस झाला आहे.
आठ दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला आहे. थंडगार वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकऱयांसह सारेच जण गारठून गेलेले आहेत. तालुक्यातील मार्कंडेय नदी व किणये-संतीबस्तवाड भागातील मुंगेत्री नदी दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास अनेक पुलांवरती पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतांमध्ये पाणी साचले असल्यामुळे भात रोपलागवड करण्यासाठी सोईचे ठरत आहे. सध्या शेतात पॉवर टिलरच्या सहाय्याने रोपलागवडीसाठी चिखल करण्यात येऊ लागला आहे. काही शिवारांमध्ये भात रोपलागवडीची कामेही सुरू आहेत. बेळगुंदी, यळेबैल, सोनोली, राकसकोप, बिजगर्णी, बेळवट्टी, इनाम बडस, बाकनुर, कावळेवाडी या भागात 40 टक्के रोपलागवड करण्यात आलेली आहे.
किणये, नावगे, संतीबस्तवाड, वाघवडे या भागात रोपलागवड करण्यासाठी अजून भाताची रोपे तयार झालेली नाहीत. त्यामुळे येत्या 8 दिवसांनंतर रोपलागवडीला सुरुवात होणार आहे. बस्तवाड, हलगा, मच्छे, पिरनवाडी या भागात धूळवाफ पेरणी करण्यात आलेले भाग बऱयापैकी बहरुन आलेले आहेत. या भात पिकामध्ये सध्या पाणी साचले असून काही ठिकाणची भातपिकं पाण्याखाली गेलेली आहेत. भुईमूग व बटाटा या पिकांची उगवण झालेली आहे. संततधार पावसाचा बटाटा पिकावर परिणाम होणार असल्याची शक्यता शेतकऱयांनी बोलून दाखविली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने रताळी लागवड केलेली आहे. 90 टक्के रताळी लागवड करण्यात आली असून उर्वरित रताळी वेल लागवड करताना शेतकरी दिसत आहेत.
आठ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. यंदा मृग नक्षत्र कोरडेच गेले. यामुळे खरीप खंगाम साधायचा कसा, याची चिंता शेतकऱयांना लागून होती. मात्र 22 जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली आणि या आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. दि. 6 जुलैपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात झाली. या पुनर्वसूच्या पावसाने मात्र चांगलेच झोडपून काढले आहे. या नक्षत्र काळातच सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. दि. 19 जुलै रोजीपर्यंत पुनर्वसू नक्षत्र आहे. सध्या पावसाची परिस्थिती पाहता पुनर्वसू नक्षत्र संपेपर्यंत तरी पाऊस असाच सुरू राहणार असल्याचे दिसत आहे. दि. 20 रोजीपासून पुष्य नक्षत्राला प्रारंभ होणार आहे.
उचगाव येथील नदीचे पाणी पात्राबाहेर
बेळगावच्या पश्चिम भागामध्ये जोरदार वृष्टी होत असल्याने तसेच राकसकोप धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडल्याने मार्कंडेय नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. मार्कंडेय नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीमध्ये आता पाण्याचा शिरकाव झाल्याने नदीकाठच्या पिकांचे नुकसान होणार, याची चिंता आता शेतकरी वर्गाला लागून राहिली आहे.
मार्कंडेय नदीच्या परिसरात राकसकोप, बेळगुंदी, सोनोली, शिनोळी, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, उचगाव, सुळगा, गोजगा, मण्णूर, आंबेवाडी या गावातील शेतकऱयांची शेती पसरलेली असून या शेतवडीत सध्या भात, ऊस, भाजीपाला अशी वेगळी पिके सध्या जमिनीवर उगवून येत असतानाच मुसळधार पावसाचा मारा आणि त्याबरोबरच नदीच्या पात्रातील पाण्याने आता शेतवाडीत प्रवेश केल्याने कोवळी पिके पाण्याखाली जाऊन नुकसान होणार की काय, अशी भीती शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये नदीकाठाला असलेल्या शेतवडीतील सर्व पिके पाण्याखाली जाऊन मार्कंडेय नदीला आलेल्या पुराचा फटका बसला होता. नदीकाठच्या शेतवडीतील आतापर्यंतची पिके नुकसान झाल्याने शेतकऱयांना आर्थिक नुकसान प्रतिवषी सोसावे लागते. मात्र शासनाकडून आर्थिक मदत शेतकऱयांना मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहेत.
गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी नदीकाठचा सर्व परिसर पाण्याखाली गेल्याचे चित्र आता दिसून येत आहे.
संततधारेमुळे पूर्वभागातील शेती पाण्याखाली
गुरुवारी झालेल्या संततधार पावसाने पूर्वभागातील शेती जलमय झाली असून बळ्ळारी नाल्यासह इतर नाल्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. अशीच पावसाची रिपरिप सुरू राहिल्यास बळ्ळारी नाल्याला पूर येण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. पूर्व भागामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे, अशातच गुरुवारी पावसाचा जोर वाढल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. तर बळ्ळारी नाला परिसरातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने भात पिकांची म्हणावी तशी उगवण झाली नव्हती. तर आता भात पिकांची चांगली उगवण झाली असली तरी यामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले आहे. भातपिके फार दिवस पाण्याखाली राहिल्यास कुजण्याची शक्मयता आहे. शेतकऱयांचे नुकसान होणार आहे.
मार्कंडेय नदीला या वर्षातील पहिला पूर
गेले चार दिवस संततधार पाऊस पडल्यामुळे कंग्राळी खुर्द गावाजवळून वाहणाऱया मार्कंडेय नदीला या वर्षातील पहिला पूर आला. पुराचे पाणी नदीकाठ शिवारामध्ये पसरले आहे. संथगतीने पाऊस पडत असल्यामुळे पुराचा जोर दिसत नसला तरी गुरुवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे मार्कंडेय नदीला यावर्षीचा पहिला पूर आल्यामुळे नदीकाठ शिवार पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून आले. यावर्षी प्रारंभापासूनच पावसाने संथगतीने सुरुवात केल्यामुळे भात पेरणी केलेल्या भात पिकाला दिलासा मिळाला. रोहिणी, मृग व आर्द्रा ही नक्षत्रे थोडा पाऊस वगळता उघडीपीमध्येच गेल्यामुळे शेतकऱयांना पेरणीची कामे उरकून घ्यायला थोडी उसंत मिळाली. यामुळे मार्कंडेय नदीकाठ शिवार परिसरातील भात पिकाची उगवण चांगली झाली. यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला. मार्कंडेय नदी राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, तुरमुरी, उचगाव, आंबेवाडी, मण्णूर, हिंडलगा, अलतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, जाफरवाडी, कडोली, काकती, गौंडवाड, होनगा, जुमनाळ आदी गावांना वरदान ठरणाऱया नदीला यावर्षीचा हा पहिला पूर आला आहे. मार्कंडेय नदीकाठ शिवारामध्ये सर्व शेतकरी रोप लागवड करत आहेत. नदीचे पुराचे पाणी लवकर ओसरले नाही तर रोपलागवड कुजून जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
20 कोटीचा निधी पाण्यात
मागील पाच वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून मार्कंडेय नदीतील गाळ काढणे व नदी बचाव मोहिमेनुसार कामगारांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने नदीभागातील गाळ काढला. परंतु गाळ नदीकाठावरच टाकल्यामुळे तसेच नदीपात्रातील झुडुपे व अतिक्रमण तसेच ठेवल्यामुळे कामगारांना रोजगार मिळाला. मात्र दुसऱयाच वर्षी नदीचे पात्र पूर्वीसारखे बनल्यामुळे शासनाचे 20 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.