खा. फ्रान्सिस सार्दिन यांची टीका
प्रतिनिधी /मडगाव
यंदा पाऊस काही पहिल्यादाच कोळसत नाही. पाऊस दर वर्षी येतो व रस्ते पाण्याखाली जातात. मात्र, यावर कायम स्वरूपी उपाय योजना आखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. प्रशासन झोपलेले आहे अशी टीका दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
पणजी शहराबरोबरच अन्य शहरातील रस्ते पाण्याखाली जाण्याची जणू परंपराच सुरू झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प होते. दुकानात तसेच लोकांच्या घरात पाणी शिरल्याने सामानाची हानी होती. यावर कायमस्वरूपी उपाय योजना काढण्याचे काम हे प्रशासनाचे. पण, प्रशासन झोपलेले असल्याने त्यांना उपाय योजना आखता आलेल्या नाहीत असे खा. सार्दिन म्हणाले.
गोवा हे छोटेसे राज्य आहे. पण, या ठिकाणी नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. गोव्यात असंख्य पर्यटक येतात, त्यांच्या समोर आपण गोव्याबद्दल कोणते चित्र ठेवतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला. थोडय़ा प्रमाणात रस्ते पाण्याखाली गेले तर ती समजण्याजोगी बाब आहे. परंतु प्रचंड प्रमाणात रस्ते पाण्याखाली जाणे वाहतूक बंद करणे हे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले. सरकारने जास्त बोलण्यापेक्षा अधिक प्रभावीपणे कामे करून दाखवावी असे ही ते म्हणाले.
कोलवा समुद्रकिनाऱयाची धूप होत आहे. मुंगूल भाग पाण्याखाली गेला आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुंगूल भागात बांधावर घरे बांधण्यात आलेली आहे. त्याचा हा परिणाम आहे. ही घरे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. वेर्स्टन बायपासचे काम स्टिल्टवर करावे ही जनतेची मागणी आहे व ती योग्य असून सरकारने स्टिल्टवरच बायपास रस्त्याचे काम करावे अशी मागणी आपण लोकसभेत केली आहे. आत्ता गोवा विधानसभेत तसा ठराव घेऊन तो केंद्र सरकारला पाठवावा असे ही खा. सार्दिन म्हणाले.
जुवारी पुलाजवळ वाहतुकीची कोंडी होत असते. तासंन तास वाहतूक खोळंबून राहते, त्यावर त्वरित उपाय योजना आखावी, या ठिकाणी आवश्यक तेव्हढे वाहतूक पोलीस तैनात करावे अशी मागणी त्यांनी केली. गोव्यात चोऱया वाढत आहे. रस्ते अपघात होत आहे. त्यावर पोलिसांचे लक्ष नसल्याची टीका ही त्यांनी केली.