रेड अलर्टऐवजी आता ऑरेंज व यलो अलर्ट
पुणे / प्रतिनिधी :
गेले दोन आठवडे राज्यभर थैमान घातलेल्या पावसाचा जोर शुक्रवारपासून ओसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला असून, घाटमाथ्यावर अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे.
मान्सून सक्रिय झाल्याने 1 जुलैपासून राज्यात पावसाने कहर केला आहे. अनेक तालुके तसेच जिल्हय़ांनी आपली जुलै महिन्याची सरासरी ओलांडली असून, नदी व नाले ओसंडून वाहत आहेत. धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांतून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नदीकाठची क्षेत्रे बाधित झाली आहेत. याशिवाय सततच्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले असून, आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली जात आहे.
उद्रारेकडे पाऊस वाढणार
उद्रार ओरिसा तसेच लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. याशिवाय येत्या 48 तासांत गुजरात किनारपट्टी व लगतच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. मान्सूनच्या सक्रियतेमुळे देशाच्या अनेक भागात जोरदार पाऊस होणार आहे. याच्या प्रभावामुळे गुजरातला 15 जुलैला रेड अलर्ट, तर उद्रार व मध्य भारतातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अतिरिक्त पाऊस
गेल्या 15 दिवसांत मान्सूनने अक्षरक्ष: राज्याला झोडपले असून, 1 जून ते 13 जुलै या कालावधीत सरासरीच्या 35 टक्के अधिक पाऊस झाला आहे, तर 1 ते 13 जुलैच्या कालावधीत सर्वाधिक पाऊस झाला असून, राज्यात सरासरीच्या 138 टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठवडय़ात म्हणजे 7 ते 13 जुलैच्या कालावधीत सर्वसाधारणपणे 72.3 मिमी इतका पाऊस होतो. मात्र, या कालावधीत 208.5 मिमी इतका पाऊस झाला असून, तो सरासरीच्या 188 टक्के अधिक आहे.
केवळ सांगली तुटीत
सांगली जिल्हा वगळता राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात पावसाने सरासरी ओलांडली आहे. सर्वच जिल्हय़ात दमदार पाऊस झाला आहे, तर सांगली जिल्हय़ात 1 जून ते 13 जुलैच्या कालावधीतील सरासरी पाहता उणे 40 टक्के पाऊस झाला आहे.
कर्नाटक-गोवाही पाणीदार
दरम्यान, जुलै महिन्यातील पावसामुळे कर्नाटक व गोवा राज्याने आपली सरासरी ओलांडली आहे. 1 जून ते 13 जुलैच्या कालावधीत गोव्यात सरासरीच्या 28 टक्के, तर कर्नाटकात सरासरीच्या 33 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
हेही वाचा : राज्याचा पाणीसाठा 43 टक्क्यांवर
ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा – 15 जुलै
यलो अलर्ट असलेले जिल्हे
ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक – 15 जुलै